मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या जोरदार पावसाचा फटका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राहत असलेल्या कलानगर परिसराला बसला आहे. वांद्रेतील कलानगरमध्ये तुफान पाणी साचलं आहे. चक्क मातोश्रीचा परिसर जलमय झाल्याने महापालिकेच्याच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वांद्र्यात जिथे राहतात तेथील कलानगर, सरकारी वसाहत, शास्री नगर, एमआयजी ग्राऊंड या सगळ्या भागात पाणी साचलं आहे. हा रस्ता पार करायला पाच मिनिटं लागतात तोच रस्ता आता पार करण्यासाठी तब्बल 20 ते 25 मिनिटं लागत आहेत.

Mumbai Rain Updates | मुसळधार पावसाने ‘मातोश्री’ जलमय, महापालिकेच्या कारभाराचे तीनतेरा | मुंबई | ABP Majha



काही दिवसांपूर्वीच 'मातोश्री'जवळच्या नाल्याची सफाई न झाल्याने महापौरांची मुख्य अभियंत्यांसोबत बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला होता.  विशेष म्हणजे हा नाला साफ न झाल्याचं उद्धव ठाकरेंनी महापौरांना लक्षात आणून दिलं होतं. त्यानंतर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी नाला साफ करण्याचे आदेश देऊनही हा नाला साफ न झाल्यानं महापौरांची अभियंत्यासोबत शाब्दिक चकमक झाल्याची माहिती समोर आली होती.

'मातोश्री' बंगल्याजवळचा नाला साफ झाला नाही म्हणून शिवसैनिकांची पर्जन्यजलवाहिनी विभागाचे मुख्य अभियंता विद्याधर खंडकर यांच्यासोबत बाचाबाची झाली. 'मातोश्री'जवळच्या ओएनजीसी नाल्याची महापौर पहाणी करत असतांना शिवसैनिक आणि मुंबई महापालिका अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यावेळी विद्याधर खंडकर आणि महापौरांमध्येही शाब्दिक वादावादी झाली. या गोंधळात शिवसैनिक आणि महापालिका अधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती.

महापौरांना तुंबलेली मुंबई दिसेना                         

अनेक रस्त्यांवर पाणी साचलेलं असलं तरी मुंबई कुठे तुंबली आहे? असा उलट प्रश्न मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर विचारत आहेत. नालेसफाईची कामं चांगली झाली आहेत. काही तुरळक ठिकाणी पाणी साचलं आहे. या व्यतिरिक्त मुंबई सुरळीतच आहे, कुठेही तुंबलेली नाही, असा दावाही त्यांनी केला.

महापालिका उपआयुक्तांनीही महापौरांची री ओढत मुंबई तुंबली नसल्याचा दावा केला. फक्त काही ठिकाणी पाणी जमा झालं आहे. प्रसारमाध्यमांच्या पाणी तुंबण्याच्या व्याख्या चुकीच्या असल्याचं मुंबई उपआयुक्तांचं म्हणणं आहे. सखल प्रदेशात पाणी साचतंच, असंही ते सांगायला विसरले नाहीत.

VIDEO | मुंबई सुरळीत, कुठेही पाणी तुंबलेलं नाही, महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा दावा | एबीपी माझा



संबंधित बातम्या

मुंबईत पाऊस पडला, महापौरांनी नाही पाहिला!

'मातोश्री'जवळच्या नाल्याची सफाई न झाल्याने महापौरांची मुख्य अभियंत्यांसोबत बाचाबाची?