मुंबई : मुंबईसह पश्चिम उपनगरांमध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली. दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला या भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. पहाटेपासून सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. रविवारी रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत होता. तर सोमवारी पहाटेपासून मुंबई उपनगरांतील विविध भागांत पावसाच्या सरी बसरत आहेत. गेल्या आठवड्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार आगमन केलं आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.


मुंबईतील दादर, परळ, सायन, घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, गोरेगाव, मालाड या भागांत सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने पाणी साचलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. हिंदमाता परिसरातही मुसळधार पावसामुळे पाणी साचलं आहे. पाणी साचल्यामुळे या भागांतील वाहतूक ठप्प झाली आहे. सकाळची वेळ असल्यामुळे अनेकजण कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. अशातच गुडघाभर साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. तसेच पाणी साचल्यामुळे हिंदमाता उड्डाणपुलाखालचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाणी कमी करण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून मॅनहोल्सही उघडे करण्यात आले आहेत.


दरम्यान, जुलै महिन्याच्या अखेपर्यंत राज्याच्या विविध भागांत पाऊस कायम राहणार आहे. प्रामुख्याने कोकण आणि विदर्भामध्ये पुढील तीन-चार दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, रविवारी कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक पावसाची नोंद झाली आहे.