मुंबई : मुंबईची उपनगरं, नवी मुंबई, ठाणे-कल्याण, वसई-विरार भागात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. काही भागात पावसाची रिमझिम सुरु आहे. मात्र येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.


कोकण-गोव्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. त्यामुळे पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी पावसाचे असणार आहेत.

विमान उड्डाणं सुरु

मुंबई विमानतळाच्या रनवेवर अडकलेलं स्पाईस जेटचं विमान काल रात्री बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर रनवे स्वच्छ करण्याचं काम पूर्ण झालं असून एअर इंडिया वगळता सर्व विमानांची उड्डाणं सुरु करण्यात आली आहेत. एअर इंडियाची विमानसेवाही काही वेळेत सुरु करण्यात येणार आहे.

मुंबईतील मोठ्या पावसामुळे एअरपोर्टवरचा रनवे चिखलानं माखला होता, त्यामुळे मुंबईत येणाऱ्या आणि जाणाऱ्या विमानांची उड्डाणं रद्द करावी लागली होती.

चक्रीवादळाच्या अफवांना बळी पडू नका

दरम्यान, तुमच्या मोबाईलवर येणारे चक्रीवादळाचे मेसेज निव्वळ अफवा आहेत, त्यावर विश्वास ठेवू नका, असं आवाहन मुंबई महापालिकेनं केलं आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पत्र पालिका आयुक्त अजॉय मेहतांनी सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलं आहे.

सोशल मीडियावर गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत चक्रीवादळ होण्याच्या अफवांचा पाऊस पडला होता. मात्र चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्यानं फेटाळली आहे.

राज्यात धरणं तुुडुंब

मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक धरणं तुडुंब झाली आहेत. साताऱ्यात मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचे दरवाजे आणखी अर्ध्या फुटाने उघडले आहेत. म्हणजे दोन फुटाच्या दरवाजातून 21 हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला.