मुंबई : तीन महिन्याच्या लॉकडाऊननंतर राज्यात अनलॉक वन राज्‍य सरकारकडून सुरू करण्यात आलेला आहे. मात्र, कोरोनाचं संकट अजून पूर्णपणे टळलेलं नाही. तरीही रस्त्यांवर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. ज्याला रोखण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई पोलिसांनी अनलॉक पॉलिसी संदर्भात राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीचे पालन करण्यास नागरीकांना आवाहन केलं असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करत आहेत. सरकारने उद्योगधंदे सुरू करण्यास मुभा दिली असून नियमांमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत काहीजण विनाकारण घराबाहेत पडत आहेत. परिणामी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडता दिसत आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जाहीर केली आहे. लोकांनी या नियमांचे पालन करण्याचे आवाहनही पोलिसांनी केलंय.
पोलिसांकडून देण्यात आलेले नियम

  • केवळ अत्यावश्य काम असेल तरचं घराबाहेर पडावे

  • घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.

  • घरापासून फक्त 2 किमीच्या परिसरात असलेल्या बाजारपेठा, दुकाने इत्यादी ठिकाणी जाता येईल. दोन किमीच्या बाहेर जाऊ नये.

  • व्यायामाची परवानगी घरापासून 2 किमीच्या परिघातील मोकळ्या जागेपुरतीच मर्यादित आहे.

  • कार्यालयात किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत दोन किमीच्या बाहेर जाण्याची परवानगी आहे.

  • सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

  • वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

  • सोशल डिस्टन्सिंगचे निकष न पाळणारी दुकाने इत्यादी बंद करण्यात येतील.

  • रात्री 9 ते पहाटे 5 दरम्यानच्या कर्फ्युमध्ये अत्यावश्यक सेवेशिवाय इतर व्यक्तींनीवर बाहेर फिरल्यास कडक कारवाई केली जाईल.

  • वैध कारणाशिवाय आपल्या स्थानिक भागापासून दूर आढळून येणारी सर्व वाहने जप्त केली जातील.

  • मुंबईच्या रस्त्यांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात विनाकारण बाहेर पडणाऱ्यावंर कारवाई करण्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांची वाहने पोलिसांनी जप्त केली जात आहे. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत लॉकडाऊनचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.


मुख्यमंत्र्याचे जनतेला आवाहन


तसेच राज्याला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले नाहीत आणि जर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली तर लॉकडाऊनची घोषणा करण्यात येऊ शकते, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे लोकांनी दिलेल्या नियमांचे पालन करुन आपली कामं करावी आणि या आजारापासून स्वतःला आणि इतरांना वाचवता येईल, याची दक्षता घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नाही. त्यामुळे लोकांनी गाफील राहून चालणार नाही आणि लोकांनी घरातून आवश्यक असेल तरच बाहेर पडण्याचे आवाहन देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं आहे. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ येऊ शकते आणि त्या वेळेला फक्त जीवनावश्यक वस्तू सुरू राहिल, असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले.

CM Uddhav Thackeray | 30 तारखेनंतर लॉकडाऊन उठणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे