Devendra Fadnavis : आगामी मुंबई महापालिका निवडणूक (BMC Election) ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे, असे समजून आणि लढा आवेशपूर्ण  शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महापालिका निवडणुकीसाठी दंड थोपटले आहेत. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह (Amit Shah Mumbai Tour) हे मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपच्या 200 पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी भाजपकडून (BJP Mumbai) आगामी मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले. 


भाजपने अमित शाह यांच्या उपस्थितीत  'मिशन मुंबई' ला सुरुवात केली आहे. अमित शाह यांनी मुंबईत गणेश दर्शन केल्यानंतर अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना आक्रमक भाषण केले. त्यांनी म्हटले की, संपूर्ण देशाला  चाणक्य कोण आहेत हे माहीत आहे आणि चाणक्य म्हणजे अमित शाह आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.


पुढे त्यांनी म्हटले की,  मुंबईत ओरिजनल शिवसेना आमच्यासोबत आली आहे. गणेशोत्सवात सगळीकडे भाजपचाच बोलबाला आहे. या भरवशावर शिवसेना राजकारण करत असते आपण त्यांना मागे टाकू. आपल्या जीवनातील ही शेवटली निवडणूक आहे असे माना आणि अभी नही तो कभी नही असे ठरवा. आता केवळ एकच लक्ष्य-मुंबई महानगरपालिका असल्याचे आवाहन फडणवीसांनी केले. आपले 'मिशन मुंबई' साठी सर्व पदाधिकरी नगरसेवक भाजपा कार्यकर्त्याचे महत्वाची भूमिका आहे. आता सर्वांनी तयारी जोरदार करायची असेही फडणवीसांनी म्हटले. वॉर्ड रचना काय होईल, कसा प्रभाग असेल याचा विचार करून चालणार नाही, काम करत रहावे असेही त्यांनी म्हटले.


मुंबईला भ्रष्टाचारातून मुक्त करायची आहे: आशिष शेलार 


मागील निवडणुकीत जे निसटलं ते यंदा गमवायचं नाही, असं सांगत मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी म्हटले. मागील निवडणुकीत 50 ते 100 मतांनी 13 वॉर्डमध्ये पराभव झाला. आता 135 जागांवर विजय मिळवायचा असल्याचे त्यांनी म्हटले. मुंबई एका भ्रष्टाचारी परिवारात अडकली असल्याचा हल्लाबोल शेलार यांनी केला. आता मुंबईकरांसाठीच आपल्याला मैदानात उतरायचं आहे. आपल्याला इतिहास रचायचा आहे. आपण सर्व एका नव्या इतिहासाचे साक्षीदार होणार असून 2017 ला राहिलेलं स्वप्न 2022 ला पूर्ण करायचे आहे असेही शेलार यांनी म्हटले.