BMC Election : मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) वॉर्ड संख्येबाबत सुप्रीम कोर्टातलं (Supreme Court) प्रकरण थेट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीसाठी येणार आहे. त्यामुळे बीएमसी महापालिका निवडणुका (BMC Election) तोपर्यंत लागणार नाहीत हे देखील स्पष्ट झालं आहे. सुप्रीम कोर्टाने आज वॉर्ड संख्येतील बदलाबाबत बीएमसी आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे. 92 नगर परिषदांसंदर्भात जे प्रकरण प्रलंबित आहे त्यासोबत हे प्रकरण जोडण्याची विनंती करण्यात आली होती पण कोर्टाने ही याचिका स्वतंत्र ठेवली आहे.


फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपुष्टात


मुंबई महापालिका निवडणुका कधी होणार याची उत्सुकता गेल्या वर्षांपासून मुंबईकरांना आहे. खरंतर फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महापालिकेची मुदत संपली. त्यामुळे फेब्रुवारी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकांच्या नव्या निवडणुका कुठल्या प्रभाग संख्येनुसार होणार 227 की 236 हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहे. महाविकास आघाडी सरकारने बीएमसी वॉर्ड संख्या 227 वरुन 236 केली. पण त्यानंतर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ही वॉर्ड संख्या पुन्हा 227 केली. लोकसंख्येच्या आधारावर वॉर्ड संख्या वाढवल्याचं महाविकास आघाडी सरकारने म्हटलं होतं. पण हायकोर्टाने शिंदे फडणवीस सरकारचा निर्णय मान्य करत कायम ठेवला होता. त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे.


आता थेट ऑगस्ट महिन्यात सुनावणी


सुप्रीम कोर्टात आज या प्रकरणावर सुनावणी झाली त्यावेळी काही युक्तिवाद झाले. निवडणूक नियम सांगतो की, आधीच्या जनगणनेनुसार वॉर्ड संख्या ठरवावी लागते. त्यामुळे 2001 च्या जनगणनेनुसा 227 ही वॉर्ड संख्या होती. 2011 च्या जनगणनेनुसार आपण 236 केली असा युक्तिवाद मविआकडून करण्यात आला. त्याला महाधिवक्ता तुषार मेहता यांनी उत्तर दिलं. दोन्ही बाजूंनी काही वेळ युक्तिवाद झाला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस बजावली. आता प्रकरण थेट ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणीसाठी येणार आहे.


मुंबई महापालिका निवडणुका कशामुळे रखडल्या?



  • फेब्रुवारी 2022 मध्ये मुंबई महापालिका निवडणुका अपेक्षित होत्या

  • सुरुवातीला कोविडचं संकट असल्यामुळे महापालिका निवडणुका पुढे ढकलल्या

  • राज्यात ठाकरे सरकार असताना वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली. मुंबईतील 227 वॉर्डची संख्या 236 करण्यात आली.

  • नव्या वॉर्डरचनेनुसार आरक्षण सोडतही निघाली परंतु दरम्यानच्या काळात ठाकरे सरकार कोसळलं 

  • सत्तांतर झाल्यानंतर शिंदे फडणवीस यांनी वॉर्ड पुनर्रचना जैसे थे ठेवली. 

  • वॉर्ड पुनर्रचना प्रकरणात सध्या कोर्टात याचिका प्रलंबित आहेत

  • या सर्व कारणांमुळे मुंबई महापालिका लांबणीवर पडल्या आहेत 


हेही वाचा


मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, लोकसभा आणि विधानसभा मात्र महाविकास आघाडीतून लढवण्याचा निर्णय; सूत्रांची माहिती