मुंबई  : चारचाकी वाहनांमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांना 11 नोव्हेंबरपासून सीट बेल्टची (Seat Belt) सक्ती करण्याचे आदेश वाहतूक पोलिसांनी काढले आहेत. या आदेशाला मनसेने विरोध केला आहे. सक्तीविरोधात मनसेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिले आहे. तसेच  मागे बसणाऱ्यांसाठी सीट बेल्टची सक्ती मागे न घेतल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा  देखील दिला आहे. 


चारचाकी वाहनांतून  मागच्या सीटवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सीट बेल्टच्या सक्तीला मनसेचा विरोध केला आहे. सीट बेल्टची सक्ती करू नये यासाठी मनसे सरचिटणीस आणि वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे.  मुंबईत 11 नोव्हेंबरपासून सीट बेल्टची सक्ती केली जाणार आहे. गाडीत मागे बसलेल्या व्यक्तीने सीट बेल्ट लावला नसेल तर 
200  रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.


संजय नाईक आपल्या पत्रात म्हणाले की,   मुंबई सारख्या वाहतूक कोंडी असणाऱ्या शहरात मागे बसणाऱ्यांसाठी सीट बेल्टची सक्ती नको  आधीच वाहतूक विभागाकडून विविध प्रकारचे दंड आकारण्यात येतात आहे. तसेच मुंबई शहरात मेट्रो प्रकल्प, पूल, निकृष्ट दर्जाचे रस्ते, खड्डे, रस्त्यांची कामे चालू आहेत. यामुळे वाहतूक रहदारीची मोठ्या प्रमाणात गैरयोय होत आहे.  त्यात  आता सर्वसामान्यांना आणखी भुर्दंड सोसावा लागेल यामुळे सीट बेल्टची सक्ती नको मनसेची भूमिका आहे.  मागे बसणाऱ्यांसाठी सीट बेल्टची सक्ती मागे न घेतल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा  देखील दिला आहे. 


कारच्या मागील आसनांवर बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक असेल, अशी घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. मोटार वाहन (सुधारणा) कायदा, 2019च्या कलम 194 (ब) (1) नुसार मोटर वाहन चालकाने सुरक्षा बेल्टशिवाय वाहन चालवल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसंच सहप्रवाशांनाही सुरक्षा बेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा नसलेल्या मोटार वाहनांमध्ये सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्टची सुविधा उपलब्ध करण्यासाठी 11 नोव्हेंबर, 2022 पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर चालक अथवा सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावता प्रवास केल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.


संबंधित बातम्या :


Seat Belt New Rule : सीटबेल्ट नियम मुंबईतील टॅक्सी संघटनांना अमान्य, नियमातून वगळण्यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र