मुंबई : मुंबई लोकलमध्ये मोबाईल चोरीला जाणं काही नवीन गोष्ट नाही. मात्र चोरट्यांनी मोबाईलसकट तुमच्या महत्त्वाच्या गोष्टी लांबवण्यासाठी नवी शक्कल लढवलीय. ती म्हणजे तुमच्या बॅगांची हेराफेरी करण्याची.


 
हेराफेरी सिनेमाचे अनेक सिक्वेल सध्या मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये घडतायत. या टोळीची काम करण्याची पद्धत अनेकांची मती गुंग करणारी आहे. तुम्ही बॅगेसह लोकलमध्ये चढलात, की या टोळीपैकी एक जण हुबेहुब तुमच्या बॅगेसारखीच बॅग घेऊन तुमच्या जवळ येतो.

 
बऱ्याचदा तुम्ही मोबाईलमध्ये गुंग होता, अनेकदा तुमचा डोळाही लागतो. मात्र जोपर्यंत डोळा उघडतो, तोपर्यंत चोरानं आपला कार्यभाग साधलेला असतो. त्याची बॅग तुमच्याकडे आणि तुमची बॅग त्याच्याकडे. हा घोळ एवढ्यावरच थांबत नाही. ही टोळी तुमच्या बॅगेतील महत्वाच्या गोष्टी काढून घेते आणि रिकाम्या बॅगनं परत दुसऱ्या लोकलमध्ये चढते. पुन्हा तुमची बॅग ठेवून दुसऱ्याची बॅग लांबवली जाते.

 
एकाच दिवशी चर्चगेट, वांद्रे आणि बोरीवलीवरुन काही जणांच्या बॅगा चोरी झाल्या. त्यांच्या बॅगा एकमेकांकडे सापडल्या, मात्र मुद्देमाल, मोबाईल, चार्जर, एटीएम कार्ड असं काहीही त्यात नव्हतं.

 
याआधी लोकलमध्ये मोबाईल चोरांचा सुळसुळाट काही कमी नाहीय. अंधेरी स्टेशनवर तर कधी लोकलमध्ये चढताना तर कधी फलाटावर झोपलेले असताना क्षणभरही तुम्ही गाफिल झालात, तर चोरानं डाव साधलाच असं समजा. त्यामुळे आता या हेराफेरीचे सिक्वेल थांबवणं, पोलिसांपुढचं मोठं आव्हान आहे.