मुंबई : एकीकडे मुंबईकर आणि मुंबईच्या आसपासच्या महानगरातील सर्व चाकरमानी मुंबई लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळीनंतरच्या या सध्याच्या आठवड्याचा आढावा घेतल्यानंतरच मुंबई लोकल सुरु करण्याबाबत विचार करता येईल अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे.


दिवाळीनंतरचा हा सध्याचा आठवडा अत्यंत महत्त्वाचा आहे. या आठवड्यात कोरोना बाधितांच्या संख्येत कितपत वाढ होत आहे. हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गर्दीच्या ठिकाणी लोकांच्या संपर्कात आलेले व्यवसायिक, हॉटेल चालक, भाजी बाजार या प्रत्येक ठिकाणी मुंबई महापालिकेने कोरोना चाचणीची शिबिरं भरवलेली होती. तसेच दिवाळीच्या दिवसांत अनेक नागरिकांनी प्रवास केला आहे. तसेच दिवाळीसाठी गावी गेलेल किंवा सुट्ट्यांसाठी बाहेरगावी गेलेले मुंबईकर आता पुन्हा मुंबईत परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांचे या आठवड्यातील आकडे कसे असतील? कोरोनाची स्थिती कशी असेल? यावर मुंबई लोकल सुरु करण्याचा कोणताही निर्णय अवलंबून असेल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली आहे.


मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह यांनी दिलेल्या माहितीमुळे मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा निर्णय काही दिवसांसाठी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतरच्या या आठवड्यातील कोरोनाची किंवा कोरोनाग्रस्तांच्या नव्या रुग्णांची स्थिती पाहूनच मुंबई लोकलसंदर्भातील कोणताही निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुशे सर्वसामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.


कोरोना गेलेला नाही, दुसरी लाट नव्हे त्सुनामी येईल अशी भीती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


आतापर्यंत चांगलं सहकार्य केलं तसचं पुढं करा, कोरोना गेलेला नाही. त्यामुळे दुसरी लाट नव्हे त्सुनामी येईल अशी भीती वाटत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक राज्यांमध्ये कोरोना वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्यामुळे आपण आधीच काळजी घेण्याची गरज आहे. नाहीतर आपल्यालाही कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. दिवाळीनंतर राज्यात पुन्हा कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबई हे प्रमाण जास्त आहे. उद्यापासून अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला.


महत्त्वाची बातमी :