मुंबई : लव्ह जिहादविरोधात बिहारमध्ये कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करु, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना टोला लगावला. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यात आला आहे. त्यावरुन भाजपच्या काही नेत्यांकडून महाराष्ट्रात हा कायदा कधी आणणार अशी विचारणा केली जात होती. त्यावेळी संजय राऊत यांनी भाष्य केलं. मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी वाढीव वीज बिलविरोधात भाजपचं आंदोलन, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी तसंच देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांनी गुपचूप उरकलेल्या शपथविधीच्या वर्षपूर्वीच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली.


तेव्हा महाराष्ट्रात लव जिहादविरोधातील कायद्यावर विचार करु : राऊत
भाजपशासित मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात लव्ह जिहादविरोधात कायदा करण्यात आला आहे. यावरुन महाराष्ट्रात कधी कायदा करणार अशी विचारणा भाजप नेते वारंवार करत होते. त्यावर संजय राऊत म्हणाले की, "लव जिहादबाबत आज सकाळीच माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये कायदा बनू दे. पण बिहारमध्ये जेव्हा नितीश कुमार कायदा बनवतील तेव्हा त्या कायद्याचा आम्ही अभ्यास करु आणि त्यानंतर महाराष्ट्रात कायद्याबाबत विचार करु. बिहारमध्ये भाजपचीच सत्ता आहे. नितीश कुमारही त्यांचेच मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे तिथे कायदा झाल्यानंतर महाराष्ट्रात विचार करु. लव्ह जिहादपेक्षा अर्थव्यवस्था, बेरोजगारी, महागाई हे मुद्दे सर्वात मोठे आहेत."


भाजपच्या आंदोलनावर राऊतांचा टीका
वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आज भाजपचं होळी आंदोलन आहे. याविषयी विचारलं असता संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना पंतप्रधानांची सांगितलेलं समजत नसेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे. कोरोनाची महामारी ही दुसऱ्या महायुद्धापेक्षा भयंकर आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला धोका पोहोचतोय, बेरोजगारी वाढतेय. आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे, असं पंतप्रधान सांगतात. पण महाराष्ट्रातील नेते पंतप्रधानांचं ऐकत नाहीत. ज्याप्रकारे रस्त्यावर आंदोलन करत आहे. मंदिरं उघडण्यासाठी जमाव गोळा करुन आंदोलन करत आहेत त्यामुळे कोरोना वाढतोय. ते कोरोनाचे बाप आहेत. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकार आणि मुख्यमंत्री निर्णय घेतील. हा मुद्दा त्यांच्या विचाराधीन असू शकेल."


ती पहाट पुन्हा उजाडणार नाही, पहाटेच्या शपथविधीवर खरमरीत भाष्य
मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपशी फारकत घेतलेल्या शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरु असतानाच 23 नोव्हेंबर रोजी राज्याला धक्का देणारी घटना घडली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे सरका केवळ 80 तास टिकलं. पंरतु संपूर्ण राजकारण ढवळून काढणाऱ्या या घटनेची आज वर्षपूर्ती आहे. या पहाटेच्या शपथविधीवर संजय राऊत यांनी खरमरीत शब्दात टीका केली. "ती पहाट नव्हती, अंध:कारच होता. त्या अंध:कारामध्ये सत्येची प्रकाशकिरणं परत कधीच दिसणार नाहीत. पुढील चार वर्षे तरी पुन्हा निवडणुका होणार नाहीत. त्यानंतर पुन्हा आम्हीच जिंकणार आहोत. पहाटे पहाटे मला जाग आली, ते अजून झोपलेलेच नाहीत. आम्हाला धक्का अजिबात बसला नव्हता, आमच्या स्मृती आनंददायी, सुखदायी आहेत, त्या पहाटेच्या सुद्धा. पहाटेनंतर त्यांना जे धक्के बसले, त्यातून ते सावरलेले नाहीत. ती पहाट पुन्हा उजाडणार नाही"