मुंबईतील कीर्ती व्यासच्या हत्येचं गूढ उकललं, सहकाऱ्यांकडून हत्या
एबीपी माझा वेब टीम | 06 May 2018 01:56 PM (IST)
मेमो दिल्याच्या रागातून दोघा सहकाऱ्यांनी कीर्तीचा जीव घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मुंबई : मुंबईतील बेपत्ता तरुणी कीर्ती व्यासची हत्या झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. कीर्तीच्या हत्येप्रकरणी तिच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मेमो दिल्याच्या रागातून दोघांनी कीर्तीचा जीव घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 28 वर्षीय कीर्ती व्यास बीब्लंट सॅलॉनच्या अंधेरी पश्चिम भागातील शाखेत फायनान्स मॅनेजर म्हणून नोकरी करत होती. कीर्ती गेल्या दीड महिन्यांपासून बेपत्ता होती. क्राईम ब्रांचने कीर्तीच्या दोन सहकाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. कीर्तीचा मृतदेह अद्याप सापडला नसला, तरी दोघांनी तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या गाडीत रक्ताचे सुकलेले डागही आढळले होते. कीर्तीच्या पालकांची डीएनए टेस्ट केल्यानंतर ते रक्त कीर्तीचं असल्याचं समोर आलं आहे. ढिसाळ कामाबद्दल कीर्तीने आरोपीला मेमो दिला होता. या रागातून सिद्धेश ताम्हणकर आणि खुशी सजवानी या दोघांनी कीर्तीचा जीव घेतल्याचा संशय आहे. मात्र हत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.