अखेर मुंबईतील जेव्हीएलआरवरचं हनुमान मंदिर हटवलं!
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 14 Dec 2017 04:03 PM (IST)
या एका मंदिरामुळे मुंबईकरांचे हजारो तास आणि हजारो लिटर डिझेल रोजच्या रोज फुकट जायचं. त्या
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरचं हनुमानाचं मंदिर आज हटलं आणि मुंबईकरांची रोजच्या वाहतूक कोंडीतून सुटका झाली. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली. आयआयटी पवईला खेटून असलेल्या या रस्त्यावर जोगेश्वरीच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेमध्ये एकूण पाच लेन आहेत. पण आयआयटीच्या मेन गेट समोर येताच रस्त्याच्या मधोमध असलेलं मंदिर वाहनांची वाट अडवायचं. पाच लेनचा रस्ता थेट एक लेनचा व्हायचा आणि मागे किमान चार किलोमीटरपर्यंत रांगा लागायच्या. पण आता हे मंदिर हटल्याने वाहनं कोणत्याही अडथळ्याविना पार होणार आहेत. मात्र आज मंदिर हटवण्यासाठी महापालिकेने कारवाई करताच स्थानिक मोठ्या प्रमाणावर जमा झाले होते. त्यामुळे पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफाही इथे होता. यामुळे जेव्हीएलआरची वाहतूक चार तास खोळंबली होती. या एका मंदिरामुळे मुंबईकरांचे हजारो तास आणि हजारो लिटर डिझेल रोजच्या रोज फुकट जायचं. त्यामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडींच्या संकटातून सुटका करण्यासाठी, संकटमोचक मारुतीनेच स्थलांतर केलं असं म्हणायला हरकत नाही.