मुंबई : मुंबईतील वांद्रे कोर्टात लग्न करुन सपत्नीक बाहेर पडलेल्या नवरदेवाला पोलिसांनी बेड्या ठोकल्याचा आश्चर्यकारक प्रकार घडला आहे. एका महिलेने नवरदेव आणि त्याच्या साथीदाराने मोबाईल चोरल्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.


टिळकनगर भागात राहणाऱ्या महिलेने आपला मोबाईल बाईकस्वारांनी चोरल्याची तक्रार पोलिसात दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज पाहिलं असता त्यामध्ये चोराच्या बाईकचा नंबरही आढळला. पोलिसांनी तपासाची सूत्रं फिरवत बाईकस्वाराचं नाव आणि पत्ता शोधून काढला.

आरोपी अजय धोटे वांद्रे कोर्टात लग्न करत असल्याचं समजताच पोलिस तिथे दाखल झाले. पोलिसांनी नवविवाहित अजयची कोर्टातून वरात काढली. नवरदेवाचं हे रुप पाहून नववधू आणि पाहुणेही बुचकळ्यात पडले. पोलिसांनी अजयचा साथीदार अल्ताफ मिर्झालाही अटक केली आहे.

लग्नाच्या आदल्या रात्री अजय आणि अल्ताफने पादचारी महिलेचा मोबाईल चोरला होता. चेंबुरमधील अमर महल जंक्शनवर रात्री 9.30 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला होता. महिला फोनवर मुलीशी बोलत असताना तिचं लक्ष नसल्याची संधी साधून दोघांनी मोबाईल लंपास केला.

सुदैवाने या भागातील सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. विशेष म्हणजे त्यांच्या बाईकची नंबर प्लेटही सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत असल्यामुळे पोलिसांना चोरांचा छडा लावण्यात मदत झाली.