मुंबई : मुंबई आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना सोशल मीडिया, राजकारणी आणि सगळीकडे एकच चर्चा आहे, ती म्हणजे मुंबई नेमकी कुणी बुडवली?


काल दिवसभरात मुंबईत 200 मिमी पाऊस झाला  आणि मुंबई ठप्प झाली. अगदी 26 जुलैच्या पावसाची आठवण यावी तशी दृश्यं रस्त्यावर दिसू लागली.

पण कालच्या पावसाची तुलना 26 जुलैशी करणं अन्यायकारक आहे. कारण तेव्हा दिवसभरात तब्बल 950 मिलीमीटर पाऊस झाला होता. मग प्रश्न असा आहे की मुंबई तुंबवली कुणी? पालिकेनं, राज्य सरकारनं की तुम्ही आम्ही?

तर त्याचं पहिलं खापर अजॉय मेहतांनी तुमच्यावर फोडलं आहे. प्लॅस्टिक आणि थर्माकॉलमुळे मुंबईत पाणी तुंबल्याचा दावा मेहतांनी केला आहे. मुंबईत 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या वापरण्यास बंदी आहे. पण नियम आणि कायदे फक्त कागदावर आहेत. अनेक ठिकाणी सर्रासपणे प्लास्टिक पिशाव्या मिळत असल्याचं दिसून येतं.

मुंबईत काल दिवसभरात 313 पंपांवरुन 3 हजार 756 दशलक्ष लीटर पाणी उपसण्यात आलं. कारण नाले प्लास्टिक आणि थर्माकोलनं चोक झाले होते.

मुंबई 7 बेटांचं शहर आहे. एवढ्याशा जागेवर सव्वा ते दीड कोटी मुंबईकर राहतात. त्यात कुठल्याही नियोजनाशिवाय उभ्याआडव्या बांधलेल्या इमारती, झोपड्या आणि अतिक्रमणं हे सगळं बघता शिस्तीशिवाय मुंबई वाचणं अशक्य आहे.

त्यामुळे निसर्गाचा प्रकोप, प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि मुंबईकरांची बेशिस्त यामुळे तुमच्या आमच्यावर ही वेळ आली आहे यात शंका नाही.