दीड तासांनंतर मालाडमधील आग आटोक्यात
एबीपी माझा वेब टीम | 04 Sep 2018 12:22 PM (IST)
मालाड पश्चिममधल्या सोमवार बाजार परिसरात आज सकाळी 11 वाजता लाकडाच्या कारखान्याला आग लागली.

मुंबई : मालाडमधल्या बॉम्बे टॉकीज परिसरात लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. सध्या कूलिंग ऑपरेशन सुरु आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या मदतीने जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. मालाड पश्चिममधल्या सोमवार बाजार परिसरात आज सकाळी 11 वाजता केमिकल पावडर आणि लोखंडी डाय बनवण्याच्या कंपनीला आग लागली होती. सुरुवातीला कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आणखीच पसरल्याने कर्मचाऱ्यांनी अग्निशमन दलाला फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या 12 गाड्या आणि पाण्याचे टँकर्स घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दीड तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हा रहिवासी आणि व्यायसायिक परिसर आहे. इथे लाकडी वस्तूंची अनेक दुकानं आहेत. आगीचं नेमकं कारणं अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु आगीनंतर परिसरात धुराचे प्रचंड लोट पसरले होते. परिणामी वाहनांचे मार्ग वळवण्यात आले होते.