मुंबई : मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा हुकल्यानं आता विद्यार्थी चिंतेत पडले आहेत. राज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळू न शकल्यानं कुलगुरु संजय देशमुख यांनी स्वत: 15 ऑगस्टपर्यंत सर्व निकाल लावण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र 15 ऑगस्टच्या दिवशी फक्त दोनच विषयांचे निकाल लावण्यात आले. त्यामुळे मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं भवितव्य अंधारात सापडलं आहे.


चैतन्य जोशी नावाचा विद्यार्थी मुंबईतल्या वडाळ्यात राहतो. मुंबई विद्यापीठा अंतर्गत एचआर कॉलेमध्ये रिटेल
मॅनेजमेंटचं शिक्षण त्याने घेतलं आहे. पुढील शिक्षणासाठी त्याला कॅनडातल्या Fanshawe university मध्ये प्रवेश घ्यायचा होता. 50 हजार रुपये डिपॉझिट भरुन त्यानं जानेवारीमध्ये प्रवेशाचं पत्रही मिळवलं. पण मुंबई
विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे अजूनही चैतन्य जोशीचा निकाल लागला नाही. परिणामी परदेशात जाऊन
शिकण्याचं त्याचं स्वप्न भंगलं आहे.

चैतन्यचे फक्त 50 हजार रुपयेच वाया गेले असं नाही तर त्याचं वर्षही वाया जाणार आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेणारा चैतन्य एकटा विद्यार्थी नाही. विद्यापीठानं निकालाची डेडलाईन हुकल्यानं त्याच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न भंगलं आहे.

मुंबई विद्यापीठाची तिसरी डेडलाइनसुद्धा हुकली


31 जुलै, 5 ऑगस्ट, 15 ऑगस्ट... विद्यापीठाने तीन डेडलाईन दिल्या, मात्र एकही पाळली गेली नाही. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया गेलं. आता तर विद्यार्थ्यांना प्रश्न पडला आहे, निकाल खरंच लागणार ना.

15 ऑगस्टच्या दिवशी फक्त दोनच विषयांचे निकाल लागले. आतापर्यंत एकूण 333 विषयांचे निकाल लागले आहेत. अद्याप 144 विषयांचे निकाल बाकी आहेत. तर 1 लाख 63 हजार 245 उत्तरपत्रिकांची तपासणी शिल्लक आहेत. याशिवाय लागलेले निकाल कितपत योग्य आहेत, हा प्रश्नच आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत.

विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जायचं असेल तर त्याची तयारी त्यांना सहा महिने आधी करावी लागते. त्यासाठी आर्थिक नियोजन करावं लागतं. पण यंदा मुंबई विद्यापीठानं या सगळ्यांवर मेहनतीवर पाणी सोडलं आहे. त्यामुळे चैतन्यसारख्या अनेक विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं. याला जबाबदार कोण? त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं आहे.

संबंधित बातम्या :


मुंबई विद्यापीठाचा घोळ, पत्रकारितेच्या अनेक विद्यार्थ्यांना शून्य गुण


मुंबई विद्यापीठ पेपर तपासण्यासाठी सीएंची मदत घेणार


मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला