मुंबई : गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबईतील ताडदेवमधल्या एम. पी. मिल
कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पातील एफएसआय घोटाळ्याप्रकरणी प्रकाश मेहता यांची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतच ही घोषणा केल्याने मेहता यांचा पाय खोलात गेला आहे.


एम. पी. मिल कम्पाऊंड येथील एसआरए प्रकल्पात झालेल्या एफएसआय घोटाळ्याप्रकरणी नियम 293 अन्वये
विरोधकांनी गेल्या आठवड्यात चर्चा उपस्थित केली होती. विकासकाला फायदा देण्यासाठी प्रकाश मेहता यांनी नियम बाजूला ठेवून एफएसआय अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केला होता.

3 केच्या नियमात एका विकासकाला फायदा देण्यासाठी धोरण ठरवता येत नसल्याचं कारण सांगत गृहनिर्माण
विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी प्रस्तावाला विरोध केला होता. तसंच पीएपी (प्रकल्पबाधितांची घरं) संदर्भातही प्रस्तावावरही त्यांनी प्रतिकूल शेरा मारला होता.

मेहता यांनी ही फाईल मंजूर करताना मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारला होता. त्यामुळे या प्रकल्पाला मेहता यांच्याबरोबरच मुख्यमंत्र्यांचीही मान्यता होती का, असा सवाल पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी सभागृहात विचारला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रस्तावाला आपण कोणतीही अनुमती दिली नसल्याचं, तसंच आपली तोंडी
परवानगीही घेतली नसल्याचं स्पष्ट केलं. आपल्याला हे प्रकरण कळल्यानंतर हा प्रस्ताव आपण रद्द केला असल्याचंही फडणवीसांनी सभागृहात सांगितलं.

आपण गृहनिर्माण विभागाच्या काही फायली घेऊन मुख्यमंत्र्यांकडे बैठकीला गेलो होतो, तेव्हा एम. पी. मिल
कम्पाऊंडची फाईल नव्हती. मात्र ही फाईल घेऊन गेल्याच्या समजुतीतून आपण मुख्यमंत्र्यांना अवगत केल्याचा शेरा मारल्याचे सांगत आपल्या नैतिकतेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करु नये, असं प्रकाश मेहता यांनी सभागृहात सांगितलं.

मुख्यमंत्र्यांची मंजुरी न घेताच त्यांना अवगत केल्याचा शेरा मारणं, हे मुख्यमंत्री सांगत असलेल्या पारदर्शक कारभारावर शंका उपस्थित करणारं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय मंत्री फायलीवर खोटे शेरे मारत असतील तर मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा कोणताही अंकुश नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे खरोखरच पारदर्शक कारभार असेल तर मेहता यांची चौकशी करा, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

मेहता यांना पदावर ठेवायचे की नाही ते तुम्ही ठरवा, पण हे प्रकरण गंभीर असून चौकशी झाली नाही, तर सरकारची पारदर्शकता आणि विश्‍वासार्हतेला तडा जाईल, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मेहतांची चौकशी करण्याची घोषणा केली.

आपल्याशी कोणतीही चर्चा झाली नसताना त्यांनी शेरा मारला. मात्र या प्रकरणात पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरीसुद्धा या प्रकरणाची निश्‍चित चौकशी केली जाईल. चौकशी कशी करायची ते गटनेत्यांशी चर्चा करुन ठरवू, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.