मुंबई : मुंबईत कचरा उचलणाऱ्या गाड्यांवरील सफाई कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईच्या सर्व 24 वॉर्डमध्ये कचराकोंडी निर्माण झाली आहे. कामबंद असल्याने मुंबईत आज कोणीही कचरा उचललेला नाही.

महापालिकेने कचरा उचलण्यासाठी नव्या कंपनीला कंत्राट दिलं आहे. यामुळे कायम आणि कंत्राटवर असलेले सफाई कामगार नाराज आहेत. कारण त्यांची बदली नव्या वॉर्डमध्ये केली जात आहे. महापालिका प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कोणतीच पावलं न उचल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कांदीवली, बोरिवली आणि दहिसरमधी सफाई कर्मचारी संपावर होते. आता सगळ्या 24 वॉर्डमध्ये कचराकोंडी झाली आहे. प्रशासनाने आज याबाबत निर्णय घेतला नाही तर उद्यापासून बीएमसीचे सर्व विभाग या आंदोलनात सहभागी होती, असा इशारा कामगारांनी दिला आहे.