मुंबई : मुंबईतील आगीच्या घटनांचं सत्र थांबताना दिसत नाही. चेंबुरमधील टिळकनगर परिसरातील सरगम इमारतीत लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं.


सरगम इमारतीच्या दहाव्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी तासाभरानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र तोपर्यंत पाच जणांना प्राण गमवावे लागले होते.

72 वर्षीय सुनीता भालचंद्र जोशी, 72 वर्षीय भालचंद्र जोशी, 83 वर्षीय सुमन रामचंद्र जोशी, 52 वर्षीय सरला सुरेश गंगर आणि 83 वर्षीय लक्ष्मीबेन प्रेमजी गंगर यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

या घटनेत 86 वर्षीय श्रीनिवास रामचंद्र जोशी जखमी आहेत. तर अग्निशमन दलाचे 28 वर्षीय जवान छगन सिंगही दुखापतग्रस्त झाले आहेत.

पंधरा मजली सरगम (इमारत क्रमांक 35) मध्ये दहाव्या मजल्यावर असलेल्या घराला आग लागली होती, त्यानंतर वरच्या मजल्यांवर काही रहिवासी अडकले होते. काही काळ त्यांचा मदतीसाठी आरडाओरडा सुरु होता.

तीन दिवसांपूर्वी कांदिवलीत कापड गोदामाला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला होता. तर अंधेरीतल्या कामगार रुग्णालयात तीन दिवसात दोन वेळा आग लागली होती. यामध्ये अकरा जणांना प्राण गमवावे लागले होते, तर जवळपास दीडशे जण जखमी झाले होते.