मुंबई : लालबागचा राजा गणपती विसर्जनादरम्यान बोट दुर्घटनेतून बचावलेला साईश मर्दे हा पाच वर्षाचा मुलगा अजूनही बेपत्ता आहे. समुद्रात बोट उलटल्यानंतर साईशला वाचवलं, पण त्याला कोणी वाचवलं आणि कुठे नेलं याची माहिती नसल्याचं प्रशासनाने सांगितलं.


लालबागचा राजाचं सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास गिरगाव चौपाटीवर विसर्जन झालं. यावेळी विसर्जनाला जात असताना एक बोट उलटली. बोटीत साईश मर्देसह त्याचे वडील, आई आणि दहा वर्षांची बहीणही होती. बोट उलटताना साईश आईच्या मांडीवर होता. पाण्यात पडताना कोणीतरी त्याला आईच्या मांडीवरुन उचललं आणि दुसऱ्या बोटीत घेऊन गेले. तर आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने बोटीतील सर्वांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं.

नायर रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर आई, वडील आणि बहिण सुखरुप घरी परतले. मात्र, साईश अद्यापही बेपत्ता असून त्याचा शोध सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही रुग्णालयात साईश दाखल झाल्याची नोंद नाही. तर कोणत्याही पोलिस स्टेशनमध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवलेली नाही. त्यामुळे साईश नेमका कुठे गेला, हा प्रश्न कुटुंबीय विचारत आहेत.

मर्दे कुटुंब हे मूळचं पालघरचं आहे. गणपती विसर्जनासाठी हे कुटुंब खास पालघरहून मुंबईला आलं होतं.