मुंबई : मुंबई सत्र न्यायालयात आज एक थरारनाट्य पाहायला मिळालं. उदय पाठक नावाच्या एका आरोपीने कल्पेश पटेल नावाच्या दुसऱ्या आरोपीला आपल्या जवळील धारदार शस्त्राने भोसकलं. हे दोघही सध्या आर्थर रोड जेलमध्ये कैद आहेत. दोघांना वेगवेगळ्या केसेसमध्ये कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यामुळे या घटनेला आर्थर रोड जेलमधील गँगवॉर कारणीभूत असल्याचं बोललं जात आहे.


उदय पाठक हा साल 2011 मधील कुरार व्हिलेज परिसरात अप्पापाडा टेकडीवर झालेल्या भीषण हत्याकांडातील प्रमुख आरोपी आहे. त्याच्यावर चार जणांच्या हत्येचा खटला सुरु आहे. चेतन धुळे, दिनेश अहिरे, गणेश करंजे आणि भारत कुदळे या चौघांचे विवस्त्र मृतदेह 6 जून 2011 रोजी सापडले होते. उदय पाठकच्या गँगनेच त्यांचं अपहरण करुन त्यांना इथे आणून त्यांची हत्या केली होती.

तर दुसरा आरोपी कल्पेश पटेल हा आर्थर रोड जेलमधून मोबाईलच्या सहाय्याने खंडणी वसुलीचा धंदा करत असल्याचं बोललं जात आहे.

दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. कोर्टात लपवून आणलेल्या धारदार शस्त्राने उदय पाठकने अचानकपणे कल्पेश पटेलवर वार केला. मात्र उपस्थित पोलिसांनी ताबडतोब दोघांना वेगळ करत उदयला ताब्यात घेतलं. कल्पेशला त्यानंतर वैद्यकीय तपासणीकरता नेण्यात आलं. मात्र घडलेल्या घटनेने पोलिसांचा पहारा आणि न्यायलयाची सुरक्षा व्यवस्था ही किती तोकडी आहे हे पाहायला मिळालं.