मुंबई : बँकेत पैसे बदलण्यासाठी आलेल्या वृद्धाचा रांगेतच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली आहे. विश्वनाथ वर्तक (वय 73 वर्ष) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.


विश्वनाथ वर्तक आज मुलुंडमधील हरिओम नगर इथल्या एसबीआय बँकेत पैसे बदलण्यासाठी आले होते. मात्र बँकेबाहेर चक्कर आल्यामुळे ते जमिनीवर कोसळले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी केली. त्यानंतर या नोटा बदलण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरु आहे. नागरिकांनी सकाळपासून बँकेबाहेर रांगा लावल्या आहेत.

रिझर्व्ह बँकेचं आवाहन

दरम्यान, बँकेत पुरेसे पैसे उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरु नये, गोंधळून जाऊ नये, असं आवाहनन रिझर्व्ह बँकेकडून करण्यात आलं आहे.

मात्र आरबीआयच्या आवाहनानंतरही एटीएम आणि बँकांबाहेर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. परिणामी नोटा बदलण्याच्या धावपळीतच आज विश्वनाथ वर्तक या ज्येष्ठ नागरिकाने जीव गमावला.