Mukesh Ambani Meet CM Eknath Shinde: देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले. काल रात्री ही भेट झाली. या भेटीत नेमकं काय झालं? याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. एकीकडे तीन दिवसांपूर्वी उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या भेटीला गेले होते. तर दुसरीकडे काल रात्री मुकेश अंबानी हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी दाखल झाल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत.


काल रात्री मुकेश अंबानी हे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटले. सुमारे दीड तास ही भेट झाली.या वेळी शिंदे गटातील काही नेते मंडळीही उपस्थित होते, अशी माहिती आहे. मुख्यमंत्र्यांकडून या भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती.या भेटी मागचे नक्की कारण काय? अदानी आणि उद्धव ठाकरे भेटीनंतर शिंदे आणि अंबानी यांच्या भेटीबाबत आता चर्चा रंगली आहे.  या भेटी दरम्यान मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी आणि सोबत आणखी काही व्यक्ती देखील होत्या.  रात्री 12.15 वाजेच्या दरम्यान अंबानी कुटुंबीय वर्षा बंगल्यावरुन बाहेर पडलं. 


दसरा मेळाव्यावरुन सध्या शिवसेना आणि शिंदे गट एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. अशात देशातील दोन प्रमुख उद्योजक दोन नेत्यांना भेटायला गेले आहेत. अदानी यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली तर आता काल रात्री अंबानी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. या दोन्ही भेटींमागील नेमका उद्देश काय याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. अर्थातच या दोन्ही भेटींनंतर वेगवेगळ्या चर्चा मात्र सुरु झाल्या आहेत. 


नुकताच अदानी आणि अंबानी यांच्यामध्ये देखील एक करार झाला आहे. गौतम अदानी यांच्या अदानी आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स या देशातील मोठ्या व्यावसायिक समूहांनी एक करार केला आहे. या करारांतर्गत त्यांच्या रिलायन्स आणि अदानी कंपन्यांमध्ये एकमेकांच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीत कामावर ठेवू शकणार नाहीत. 'नो पोचिंग करार' असे या कराराचे नाव आहे. यातच या दोन उद्योजकांनी राज्यातील दोन बड्या नेत्यांची भेट घेतल्यानं चर्चा रंगली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


अंबानी-अदानी एकमेकांच्या कर्मचाऱ्यांना नोकऱ्या देणार नाहीत! काय आहे रिलायन्स-अदानी समूहाचा 'नो पोचिंग करार'?


Reliance : मुकेश अंबांनी यांचे वारसदार ठरले, 18 लाख कोटी रुपयांच्या रिलायन्स उद्योग समूहाचे विभाजन तिघांत होणार