नवी मुंबईत मनसेचा राडा, वाशी स्टेशनबाहेरील फेरीवाले हटवले
विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई | 29 Oct 2017 09:15 PM (IST)
नवी मुंबईतील मनसेच्या आंदोलनामुळे फेरीवाल्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे
नवी मुंबई : नवी मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. वाशी रेल्वे स्टेशनबाहेर अनधिकृत फेरीवाल्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी हुसकावून लावलं. शिवाय फेरीवाल्यांच्या सामानाची तोडफोडही केली. मनसेच्या आंदोलनामुळे फेरीवाल्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. मनसेचे मालाडचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे यांच्यावर नुकताच फेरीवाल्यांनी भ्याड हल्ला केला होता. मुंबईत फेरीवाल्यांचा विषय तापलेला असताना नवी मुंबईतही मनसेचं फेरीवाल्यांविरोधात आंदोलन सुरुच आहे. मालाडचे मनसे विभागअध्यक्ष सुशांत माळवदे आणि काही कार्यकर्त्ये हे शनिवारी दुपारी 3.30 च्या दरम्यान मालाड रेल्वे स्टेशन परिसरात फेरीवाले बसले आहेत की नाही याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी अचानक फेरीवाल्यांच्या जमावाने माळवदे आणि त्यांच्यासोबतच्या चार ते पाच कार्यकर्त्यांवर थेट हल्ला चढवला. यावेळी माळवदे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण पसरलं होतं. दरम्यान, संजय निरुपम यांनी चिथावणी दिल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत आहे.