मुंबई : "1773 साली "काका मला वाचवा"अशा आर्त हाका शनिवार वाड्यात लोकांनी ऐकल्या होत्या. थोड्याश्या वेगळ्या संदर्भात"माझ्या पुतण्याला वाचवा"अशा आर्त हाका काल दिल्लीत ऐकू आल्या," असा खोचक टोला मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी लगावला आहे. राजधानी दिल्लीत काल (6 एप्रिल) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीवर संदीप देशपांडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.


पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना या भेटीविषयी माहिती दिली. गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियमांनुसार काम करत नाहीत, ही गोष्ट आपण पंतप्रधानांच्या कानावर घातली. तसंच खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचा मुद्दाही पंतप्रधानांसमोर मांडल्याची माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. 


दिल्लीत काल 'माझ्या पुतण्याला ED पासून वाचवा' अशा आर्त हाका ऐकू आल्या : संदीप देशपांडे


या भेटीवरुनच संदीप देशपांडे यांनी काल दिल्लीत माझ्या पुतण्याला वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्याचा टोला लगावला. संदीप देशपांडे यांच्या प्रतिक्रियेला पार्श्वभूमी आहे ती ईडी कारवाईची. महाराष्ट्रात ईडीने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना दणका देत कारवाई केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची संपत्ती देखील ईडी जप्त केली. अशीच कारवाई अजित पवार यांच्यावर होऊ नये त्याआधी शरद पवार यांनी मोदींची भेट घेऊन पुतण्याला वाचवा असं मोदींना सांगितल्याचं संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षरित्या सुचवलं.






एबीपी माझाशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "इतिहास आपण पाहिला तर 1773 साली शनिवारवाड्यात काका मला वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्या होत्या. 2022 साली माझ्या पुतण्याला वाचवा अशा आर्त हाका दिल्लीत ऐकू आल्या. ईडीपासून माझ्या पुतण्याला वाचवा अशा आर्त हाका ऐकू आल्या. त्यामुळे कधी काका मला वाचवा असतं तर कधी माझ्या पुतण्याला वाचवा असं असतं. इतिहासाची पुनरावृत्ती होत असते."



संजय राऊत यांच्यावरील ईडीच्या कारवाईविरोधात शिवसेना आज रस्त्यावर उतरणार आहे. त्याविषयी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, "त्यांचा पक्ष आहे त्यांनी ठरवावं काय करायचंय, हा त्यांचा विषय आहे. त्यांनी शक्य आहे तेवढं शक्तिप्रदर्शन करावं. केंद्रीय तपास यंत्रणा स्वतंत्रपणे काम करत असतात, राग किंवा खुन्नसने काम करत नसतात असं संजय राऊत एकदा एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा शांतपणे त्याचं वाक्य
ऐकावं."