वाशी टोलमाफ करा अन्यथा खळ्ळ खट्याक, मनसेचा इशारा
एबीपी माझा वेब टीम | 22 Aug 2018 12:15 PM (IST)
नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्री आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतच प्रसिद्धीपत्रक सादर केलंय.
मुंबई : मुलुंड, ऐरोलीप्रमाणे सरकारनं सायन-पनवेल महामार्गावरील वाशी टोलही माफ करावा अशी मागणी मनसेनं केली आहे. पुढील सात दिवसांच्या आत टोल माफ न केल्यास मनसे स्टाईल खळ्ळ खट्याक आंदोलन करण्यात येईल अशा इशाराही मनसेनं दिला आहे. नवी मुंबई मनसे अध्यक्ष गजानन काळे यांनी मुख्यमंत्री आणि एमएसआरडीसी मंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतच प्रसिद्धीपत्रक सादर केलंय. सायन पनवेल मार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य वाढलं असून अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. तसेच टोलमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते, त्यामुळे सायन-पनवेल मार्गावरचा टोल माफ करण्यात यावा, अशी मागणी मनसेनं केली आहे. तब्बल 1220 कोटी रुपये खर्च करुन सायन-पनवेल महामार्ग बांधण्यात आला. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. खड्ड्यामुंळे या वर्षात जुलै महिन्यात सनी विश्वकर्मा आणि इब्राहीम खुर्शीद या दोघांना प्राण गमवावे लागले. याच अपघातांचा संदर्भ देत निष्पाप लोकांचे जीव जाणे हे अत्यंत गंभीर असल्याचे मनसे उपशहर अध्यक्ष नितिन चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. संबंधित बातम्या