मुंबई जनता रोड टॅक्स देते मग टोलचा भार कशाला असा रोखठोक सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना केला. राज्यातील टोलचा (Toll Issue) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. राज्यातील विविध ठिकाणच्या टोलच्या मुद्यावरून आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली.


टोलची दरवाढ करण्यात आली आहे ती करू नये अशी मागणी करण्यात आली. टोल नाक्यांवर सुविधांचा अभाव का? महिलांसाठी शौचालयं का नाही, असा सवालही त्यांनी केला. रस्त्यांची अवस्थादेखील चांगली नसल्याचा मुद्दाही या बैठकीत राज ठाकरेंनी उपस्थित केला. टोल वसुलीच्या माध्यमातून युती सरकारच्या काळातील उड्डाणपूल आणि रस्ते बांधणीचा खर्च वसूल करण्यात येत आहे. मात्र, आता 2027 नंतर एमएमआरडीए टोल वसूल करणार असल्याचा मुद्दा राज ठाकरे यांनी उपस्थित केला.  


ठाण्यातील वाहनांना टोल माफ होणार?


आरटीओ विभागाचे ठाणे पासिंग असलेल्या MH 04 क्रमांकाच्या वाहनांना टोल माफ करायचा विचार सुरू आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांना दिले. 


15 दिवस टोलनाक्यावर MSRDC कडून टोलवर व्हिडीओग्राफी केली जाणार आहे. त्यात MH 04 क्रमांकाची किती वाहने ये-जा करत आहेत, याचा आढावा घेऊन एक अहवाल सादर केला जाईल. त्याआधारे टोल माफीचा निर्णय घेण्यात येणार आहे.  


वाशी टोलनाक्यासह इतर टोलनाक्यांवर सोयीसुविधांसाठी लवकरच एक समिती गठीत केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. टोल नाक्यांवर पिवळी रेषा नसल्याची कबुली MSRDC च्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत दिली.