मुंबई : शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळांना नोटीस धाडली आहे. ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा वापर हा राजकीय विचार पसरवण्यासाठी होता कामा नये, असा आदेश देण्यात आला आहे. यावरुन हे निव्वळ राजकारण सुरू असल्याची टीका भाजपने केली आहे. मुंबईतील एका शाळेत सीएए समर्थनावरुन विद्यार्थ्यांनी पोस्टकार्ड लिहिली होती. त्या पार्श्वभूमीवर ही निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.


माटुंगा येथील दयानंद बालक विद्यालय आणि दयानंद बालिका विद्यालय या दोन शाळेंच्या मुख्याध्यापकांना शिक्षण उपनिरिक्षकांनी कारणे दाखवा नोटीस धाडली आहे. यात सीएएच्या समर्थनार्थ पोस्टकार्ड लिहिणे आणि सीएएच्या समर्थनार्थ घेण्यात आलेल्या बैठकीबद्दल खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील शाळांना नोटीस पाठवली आहे. यात विद्यार्थ्यांचा कोणताही राजकीय विचार पसरवण्यासाठी वापर होता कामा नये, असा आदेश देण्यात आला आहे. फक्त मुंबईच नाही तर राज्यातल्या सर्वच शाळांना हे पत्र पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली आहे.

भाजपची टीका -
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या निर्णयावर भाजपने टीका केली आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी सीएएवरुन केवळ राजकारण सुरू असल्याचे म्हटले आहे. सध्या सीएएवरुन देशभरात वातावरण तापलं आहे. डाव्या संघटना आणि काँग्रेस मित्र पक्षांकडून या कायद्याविरोधात आंदोलने सुरू आहेत. तर, दुसरीकडे भाजपसह उजव्या विचारसरणीच्या संघटना सीएएच्या समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपने आता शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ आणि विविध शैक्षणिक संस्थामध्ये सीएएच्या समर्थनार्थ बैठकांचे आयोजन सुरू केलं आहे.

सुधारिक नागरिकत्व कायदा देशभरात लागू -
सुधारित नागरिकत्व कायदा 10 जानेवारीपासून संपूर्ण देशात लागू करण्यात आला आहे. यासंदर्भातली अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. या कायद्याला देशात विविध ठिकाणी विरोध सुरुच आहे. अनेक राज्यांनी देखील या कायद्याची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरुन आता आरोप-प्रत्योरोप सुरू झाले आहेत.

संबंधित बातमी - CAA Protest | सीएएविरोधावरुन ममतादीदींच्या पश्चिम बंगालमध्ये गरजले मोदी

Congress on CAA | सीएए विरोधात काँग्रेसचा मोठा निर्णय | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha