कल्याण : डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे वादात सापडण्याची चिन्हं आहेत. कारण मनसेच्या टीकेला उत्तर देताना चव्हाण यांनी थेट ठाकरे घराण्यावरच निशाणा साधला आहे. त्यामुळे युतीच्या राज्यात चव्हाणांवर 'धनुष्यातून बाण' सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.


डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आजवर अनेकदा चर्चेत आले होते. आता पुन्हा एकदा त्यांनी असंच एक वक्तव्य केलं आहे. मात्र यावेळी त्यांनी थेट ठाकरे घराण्यावरच निशाणा साधला आहे. त्यामुळे युतीच्या राज्यात चव्हाणांचं नेमकं चाललंय काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

रवींद्र चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेतली आणि शहरातली रखडलेली कामं मार्गी लावण्याचे आदेश दिले. अर्थात काही महिन्यांवर आलेली विधानसभा निवडणूक आणि अचानक राज्यमंत्र्यांना आलेली जाग पाहता मनसेने ही संधी सोडली नाही. मनसेने थेट राज्यमंत्र्यांची कामं दाखवा आणि 501 रुपयांचं बक्षीस मिळवा, अशी घोषणा केली.मनसेची ही टीका बहुधा राज्यमंत्र्यांना चांगलीच जिव्हारी लागली असावी. या टीकेला रवींद्र चव्हाण यांनी एका भाषणात उत्तर दिलं, पण ते करताना त्यांनी थेट अख्ख्या ठाकरे घराण्याचाच उद्धार केला.



डोंबिवलीत एखादं काम कोणत्या तरी ठाकरेंनी सांगितलं म्हणून होत नाही, असं म्हणत त्यांनी टीकेला उत्तर दिलं खरं, पण ठाकरे नेमके कोण? राज ठाकरे, उद्धव ठाकरे की आदित्य ठाकरे? हे मात्र त्यांनी स्पष्ट केलं नाही. रवींद्र चव्हाण यांचे स्थानिक पातळीवर शिवसेनेशी फारसे सलोख्याचे संबंध नाहीत. मागील निवडणुकीत तर सेनेनं त्यांना पाडण्यासाठी मोठा जोर लावला होता. त्यात यंदाही युती होते की नाही याची शाश्वती कुणीच देऊ शकत नाही. त्यामुळे राज्यमंत्र्यांनी एका बाणात दोन पक्षी मारले की काय? अशी चर्चा सध्या सुरु आहे. मात्र सध्याच्या युतीच्या सरकारात राज्यमंत्री असलेल्या चव्हाणांवर धनुष्यातून बाण सुटू नये, म्हणजे झालं..!