मुंबई: पत्रकारांना धमकी देणाऱ्या प्रकाश मेहतांनी दिलगिरी व्यक्त करत झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. एबीपी माझाच्या 'माझा विशेष' कार्यक्रमात ते बोलत होते.


 

'माझ्या वागण्यामुळे जर त्या पत्रकाराला वाईट वाटत असेल तर मी त्या पत्रकाराची माफी मागतो. मी काही एवढा मोठा नाही. पण ती संपूर्ण क्लिप त्यांनी दाखवावी. मी मान्य करतो की, त्यावेळी माझा संयम सुटला आणि म्हणून मी चिडलो.' असं म्हणत प्रकाश मेहता यांनी घडल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे..

 

तर, दुसरीकडे मंत्रिमंडळातून मेहतांची हकालपट्टी करा, नाही तर सभागृह चालवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका काँग्रेसनं घेतली आहे.

 

काय आहे प्रकरण:

 

‘मृतांच्या नातेवाईकांना प्रशासनाकडून कुठलीही माहिती मिळत नाही. लांबून आलेल्या नातेवाईकांची कुठलीही सोय महाडमध्ये का केली नाही?’ असे प्रश्न विचारताच प्रकाश मेहता यांचा पारा चांगलाच चढला. ‘याबाबत माझा पक्ष काय ते बघून घेईल. असं म्हणत त्यांनी पत्रकारालाच दमदाटी सुरु केली.

 

इतकंच नव्हे तर, त्यांच्या कार्यकर्त्यांनीही यावेळी दमबाजी करत हे चित्रीकरण थांबवण्यासाठी सामचे पत्रकार मिलींद तांबे यांना धमकावल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं एकीकडे लोकांचे जीव गेल्यानंतरही सरकारचा उद्दामपणा आणि धमकावणं सुरुच असल्याचं दिसतं आहे.

 

प्रकाश मेहतांचं उद्धट स्पष्टीकरण:

 

या प्रकरणाची प्रतिक्रिया एबीपी माझानं प्रकाश मेहतांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही त्यांचा उद्धटपणा कायम दिसून आला. कारण, ‘पत्रकारानं असा काय प्रश्न तुम्हाला विचारला होता की, तुमचा पारा एवढा चढला?’ असं विचारलं असता प्रकाश मेहता म्हणाले की, ‘कोणतेही फालतू प्रश्न विचारत होते. मी फालतू प्रश्नांना उत्तरं देत नाही. काहीही अफवा पसरवल्या जात आहेत.’

 

यानंतर महाडबाबतचा प्रश्न फालतू होता का? असा प्रश्न एबीपी माझाकडून त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी ततपपफ करत या प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ एडिट करुन दाखवला आहे. हे सगळं खोटं आहे. असा कांगावाही त्यांनी केला.