मुंबई: मी कुठलाही राजकीय संन्यास घेणार नाही. मी निवडणुका लढवणार नाही हे वेगळ्या संदर्भाने म्हणालो, असं स्पष्टीकरण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे.


चंद्रकांत पाटील यांनी काल कोल्हापुरात निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली होती. त्यावर आज त्यांना विचारलं असता राजकीय संन्यास घेणार नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

चंद्रकांत पाटील आज काय म्हणाले?

निवडणूक लढणार नाही हा विषय कोल्हापुरात डॉल्बीसंदर्भात भूमिका मांडताना घेतला. गेल्यावर्षी कोल्हापूरमधला गणेशोत्सव डॉल्बीमुक्त केला. काल गणपती अवॉर्डच्या कार्यक्रमात स्थानिक शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले की डॉल्बी बंदीमुळे काही मंडळं नाराज झाली. त्यावर मी म्हणालो की यामध्ये माझा काही पर्सनल किंवा पॉलिटिकल अजेंडा नव्हता. कारण मला कुठली निवडणूक लढवायची नाही. मला एखादी सामाजिक भूमिका घेताना त्यात सामाजिक स्वास्थ्य असेल तर मला मतदान नाही झालं किंवा निवडणुकीत अडचण येत असेल तरी चालेल अशी माझी कायम भूमिका आहे.आमच्याकडे राजकीय संन्यास घेणं आमच्या हातात नसतं, ते पार्टी ठरवते. अजून तरी पार्टीने कुठलीही निवडणूक लढू नका असे सांगितलेलं नाही.

समाजहिताचे निर्णय घेताना निवडणुकांची भीती बाळगत नाही. गेल्यावर्षी कोल्हापुरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा केला. तसा निर्णय हा सामाजिक स्वास्थ्यासाठी घेतला जातो. त्यात राजकारण नसतं. त्यामुळे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव हा निर्णय निवडणुकांच्या तोंडावर घेतोय असं नाही. सध्या निवडणुका नाहीत, त्यामुळे ना मी लोकसभा लढवतोय, ना विधानसभा, ना पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवणार, असं मी म्हटलं होतं.

त्यामुळे मी पुढच्या निवडणुकाच लढवणार नाही असा त्याचा अर्थ होत नाही. माझं कालचं विधान कालच्या घटनेपुरतं मर्यादित होतं. मी निवडणूक लढवावी की नाही हा निर्णय पक्ष घेईल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील काल काय म्हणाले होते?

कोल्हापुरात ‘गणराया’ पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवादही साधला.

मी यापुढे कोणतीच निवडणूक लढवणार नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, “मला ना लोकसभा, ना विधानसभा, ना पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवायची. मी कोणतीच निवडणूक लढवणार नाही.”



चंद्रकांत पाटलांकडे महत्त्वाची खाती

चंद्रकांत पाटील हे राज्य भाजपमधील अत्यंत मोठे नेते असून, राज्य मंत्रिमंडळातही त्यांच्याकडे महत्त्वाची मंत्रिपदं आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री, महसूल मंत्री, मदत व पुनर्वसन मंत्री अशी तीन महत्त्वाची खाती सांभाळणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी आपलं सार्वजनिक आयुष्याची सुरुवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी संघटना असलेल्या अभाविपच्या माध्यमातून केले.  चंद्रकांत पाटील यांनी सलग तेरा वर्षे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून काम केले.

2004 साली भाजपमध्ये प्रवेश करत, त्यांनी सक्रीय राजकारणात प्रवेश केला.

2008 मध्ये ते पुणे पदवीधर मतदारसंघातून पहिल्यांदा विधानपरिषदेवर निवडून आले. 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर पाटील यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली.

त्यानंतर 2014 साली राज्यात सत्ता आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले. सध्या त्यांच्याकडे तीन महत्त्वपूर्ण खाती असून, राज्य मंत्रिमंडळातून वजनदार मंत्री म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते.

2014 पासून ते महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि ते सहकार, विपणन, वस्त्रोद्योग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख होते. जुलै 2016 पासून, ते 'महसूल, मदत आणि पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री' (सार्वजनिक उपक्रम वगळून) म्हणून कार्यरत आहेत.