अंबरनाथमध्ये खासगी कंपनीच्या जेवणातून कामगारांना विषबाधा
एबीपी माझा वेब टीम | 07 Sep 2018 08:31 AM (IST)
अंबरनाथ एमआयडीसीतल्या 'व्हर्टीव्ह' कंपनीत हा प्रकार घडला असून आठ कर्मचारी सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
कल्याण: कंपनीच्या जेवणातून कर्मचाऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ एमआयडीसीतल्या 'व्हर्टीव्ह' कंपनीत हा प्रकार घडला असून आठ कर्मचारी सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीत ही कंपनी असून तिथे जवळपास 600 कामगार काम करतात. या कामगारांना कंपनीच्या कँटीनमध्ये जेवण दिलं जातं. काल दुपारी कामगार जेवल्यानंतर अचानक त्यांना उलट्या, जुलाब आणि पोट दुखीचा त्रास सुरु झाला. जवळपास 40 ते 50 जणांना हा त्रास झाला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयांमध्ये नेण्यात आलं. यापैकी काही कर्मचाऱ्यांना उपचार करुन सोडून देण्यात आलं असून आठ जणांना संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. हा प्रकार अन्नातून झालेल्या विषबाधेचा असल्याचं संजीवनी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलंय. तर याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, कंपनीकडून मात्र कुणीही याप्रकरणी बोलायला तयार नाही. वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दबाव टाकत बातमी दाबण्याचाही प्रयत्न केला.