मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांचे घरांचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी राज्यात एकूण 11 हजार घरांची लॉटरी येत्या काही दिवसांत निघणार आहे. म्हाडाचा हा बम्पर धमाका असून काही ठिकाणी घरांच्या किमती कमी होणार असल्याचेही म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले आहे.


सोबतच म्हाडाच्या राज्यातील सर्व वसाहती, संकुले, संस्थांसाठी दर 30 वर्षांनी करावी लागणारी लीज प्रक्रिया (भूखंड करारनामा) संपुष्टात आणण्याचा महत्त्वाचा निर्णय गुरुवारी म्हाडा प्राधिकरणात घेण्यात आला आहे.

विरारमधील घरांच्या किंमती कमी होणार असून या घरांची किंमत 200 रुपये प्रति चौरस फूट कमी होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले आहे. यामुळे MIG गटातील ग्राहकांना साधारणत: 2 लाखांचा फायदा होणार तर LIG गटातील ग्राहकांना साधारणत: 1 लाख 30 हजार पर्यंत फायदा होणार आहे. याआधी विरारमध्ये घेतलेल्या ग्राहकांना  देखील हा फायदा मिळणार आहे. विरारच्या तब्बल 9500 ग्राहकांना याचा फायदा होणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.

म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना 13-2 योजनेच्या अंतर्गत घर देणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले.