मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गिरणी कामगारांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे. गिरणी कामगारांसाठी 3 हजार 894 घरांची सोडत आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जाहीर झाली. सोडतीमध्ये मिळालेलं एकही घर विकू नका, घर विकून मुंबईच्या बाहेर जाऊ नका असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांना केलं आहे. त्याचबरोबर तुमच्या हक्काच्या घरात मला चहाला बोलवा असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणालेत. म्हाडाच्या वांद्रेतील मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री अस्लम शेख उपस्थित होते.


'मी आज भाषण न करता कुटुंबातील प्रमुख म्हणून तुमच्याशी संवाद साधणार आहे, अशी भावनिक सुरुवात करुन मुख्यमंत्र्यांनी गिरणी कामगारांचे ऋण माझ्यावर आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी आलो आहे. घर लागल्यावर मला आपल्या घरी चहा प्यायला बोलवा. आपल्या घरात आनंदी राहा, घरे विकू नका मुंबईचा हक्क गमावू नका', असेही त्यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान राज्य सरकारने बंद पडलेल्या गिरण्यांमधील कामगारांसाठी घरे बांधण्याची योजना हाती घेतली आहे. सुमारे पावणे दोन लाख कामगार, वारसदारांना ही घरे पुरविण्याचे आव्हान म्हाडासमोर आहे. गिरणी कामगारांच्या घरांची सोडत आज काढण्यात आली. बॉम्बे डाइंग, श्रीनिवास मिलच्या जागेवर बांधण्यात आलेल्या 3,894 घरांची संगणकीय सोडत म्हाडाच्या वांद्रे येथील मुख्यालयात सोडत काढण्यात जाहीर झाली.

मिलच्या जागेचा गृहनिर्माणासाठी वापर -

यात बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पातंर्गत 720 सदनिका बांधण्यात आल्या आहेत तसेच बॉम्बे डाईंग(स्प्रिंग मिल )येथे 2630 सदनिका आणि लोअर परेल येथील श्रीनिवास मिलच्या जागी 544 सदनिका बांधण्यात आल्या आहेत. मुंबईतील सर्वात उच्चभ्रू ठिकाणी उभारण्यात आलेल्या गृहप्रकल्पातील 225 चौ फुटांच्या वन बीएचके स्वरूपातील सदनिका अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त आहेत. आधुनिक काळाची गरज लक्षात घेता वडाळा येथील बॉम्बे डाईंग मिल गृहप्रकल्पाच्या आवारात 15 मजल्यांचे वाहनतळ इमारत उभारण्यात आले आहे.

गिरणी कामगार सदनिका सोडतीचा पहिला टप्पा 2013 मध्ये सुरू -

यापूर्वी मुंबई मंडळातर्फे गिरणी कामगार सदनिका सोडतीच्या पहिल्या टप्प्यात 6 हजार 925 सदनिकांची संगणकीय सोडत 28 जून, 2013 ला काढण्यात आली होती. तर दुसऱ्या टप्प्यात 2634 सदनिकांची सोडत 9 जून, 2016 ला काढण्यात आली. तर, तिसऱ्या टप्प्यात एमएमआरडीएकडून भाडेतत्त्वावरील गृहनिर्माण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या पनवेल तालुक्यातील मौजे कोन येथील अशा दोन हजार 634 जोड सदनिकांची सोडत दोन डिसेंबर, 2016 मध्ये काढण्यात आली. अशा प्रकारे अद्यापपर्यंत मुंबई मंडळातर्फे एकूण 11 हजार 976 सदनिकांपैकी आठ हजार 490 सदनिकांचा ताबा गिरणी कामगारांना देण्यात आला.

Mulund | म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास रखडल्यानं मुलुंडमध्ये आंदोलन | ABP Majha