मुंबई: युती करण्यासाठी मनसेने कोणतीही अट ठेवली नसताना, शिवसेनेकडून नवी आणि अवाजवी अट ठेवली आहे. शिवसेनेकडून एक पोस्ट व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड करण्यात येत आहे.


"जर मनसे शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा देत असेल, तर त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारच उभे करु नयेत. मनसेने आपला पक्ष शिवसेनेत विसर्जित करावा", असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

शिवसेना कार्यालयातून जनसंपर्क प्रमुखांनी एक मेसेज लिहून व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड केला आहे. जरी ही पोस्ट शिवसेना कार्यालयातून अधिकृतरित्या फॉरवर्ड झाली असली, तरी अजून शिवसेनेने ही पक्षाची भूमिका असल्याचं अद्याप जाहीर केलेलं नाही.

काय आहे शिवसेना जनसंपर्क प्रमुखांची व्हॉट्सअप पोस्ट?

बिनशर्थ पाठिंबा द्या

"मनसेने मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेनेला बिनशर्थ पाठिंबा द्यावा. ( लोकसभेत मोदींना जसा पाठिंबा दिला होता अगदी तसाच )

जर मनसेने बिनशर्थ पांठिबा दिला आणि मुंबई महापालिकेत एकही उमेदवार मनसे उतरवणार नाही. अशी जाहीर घोषणा केली तरच मनसेवर विश्वास ठेवता येईल. अन्यथा मनसेचा अजेंडा म्हणजे भाजपची सुपारी आहे हे सिध्द होईल.

मराठी माणसांसाठी मनसेनं मुंबई महापालिका निवडणुकीत एकाही जागेवर उमेदवार उभा न करता शिवसेनेच्या स्वाभिमानी लढ्याला साथ द्यावी...!"

https://twitter.com/ANI_news/status/826288710735982592

मनसेसाठी वेळ केव्हाच निघून गेली आहे

"आमदार-नगरसेवक निघून गेले ना... त्याचे काय? दादरमध्ये मनसेने - 'अजून वेळ निघून गेलेली नाही'- असे बॅनर्स लावलेले आहे. प्रत्यक्षात मात्र मनसेची वेळ केव्हाच निघून गेलेली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपसोबत युती होईल, या आशेवर राज ठाकरे थांबले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेपुढे झुकतं घेत दिलजमाईचा प्रयत्नही करुन पाहिला. पण शिवसेनेने त्यांना त्यांची जागा दाखवली. खरंतर, काही दिवसांपूर्वी, ही पालिका निवडणूक न लढवण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला होता. मात्र पक्षातल्या नेत्यांनी त्यांची मनधरणी केली, व असं केल्यास आपला उरलासुरला बेससुद्धा संपेल, असं सांगितलं. तेव्हा कुठे मनसेअध्यक्षांचे डोळे उघडले"

https://twitter.com/ANI_news/status/826288840855912448

आमदार, नगरसेवक मनसे सोडून गेले

"दादरमध्ये वेळ निघून गेलेली नाही, असे बॅनर्स लावलेले असले तरी प्रत्यक्षात मात्र पक्षाचे वसंत गीते, प्रवीण दरेकर, राम कदम, मंगेश सांगळे या आमदारांसह 150 हून अधिक नगरसेवक पक्ष सोडून गेलेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांना आवाहन करण्यापूर्वी आपल्या पक्षाची वेळ निघून गेल्याचं भानही या लोकांना राहिलं नसल्याची टीका सर्वसामान्यांतून केली जात आहे. शिवसेनेने मनसेचा युतीता प्रस्ताव नाकारल्यामुळे आता या पक्षाच्या उरल्यासुरल्या आशा-आकांक्षा पण नष्ट झाल्या आहेत".

मनसे शिवसेनेत विसर्जित करा

मुंबईच्या हितासाठी शिवसेनेला विनाअट युतीचा प्रस्ताव दिला, असं बाळा नांदगावकर म्हणतायत. पण मुंबईच्या हितासाठी की रुळावरुन घसरलेल्या मनसेच्या इंजिनाला पुन्हा जिवंत करण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला, हे न कळण्याइतके मुंबईकर मूर्ख नक्कीच नाहीत. मुंबईचा विकासच करायचा होता तर मग शिवसेना सोडून मनसेची स्थापनाच कशाला करायची... ? आता, मनसे या पक्षाला शिवसेनेत विसर्जित करा, आणि मुंबईच्या विकासासाठी जोमाने कामाला लागा पाहू...! साहेबांचा आदेश.

मनसेला आताच कळवळा का?

मनसेच्या आजच्या सर्व घडामोडी. शिवसेने सोबतची आतुरता. मीडियात सुरू असलेल्या बातम्या यावरून एकचं सांगावे वाटते.

मनसेला आत्ताच का शिवसेनेसोबत युतीचा कळवळा आला...? बाळा नांदगावकर निरोप नसताना मातोश्री वर कसला प्रस्ताव घेवून पोहचले ?

22 जानेवारीपासून राज यांनी सातवेळा उध्दव ठाकरे साहेब यांना फोन केला असेल तर तर भाजपसोबत युती तुटण्याच्या अगोदर मनसे नेते का गप्प होते...??

मराठी माणसासाठी शिवसेनेनं मनसे सोबत युती करावी असा एकतर्फी अजेंडा मीडिया का प्राधान्याने घेत आहे...???

मनसे आत्ताच का एकतर्फीपणे शिवसेनेला युती करा अशी गळ घालत आहे...???

लोकसभेत मोदींना पाठिंबा देत, शिवसेनेच्या विरोधातच उमेदवार उभे करणारी मनसे भाजपचा 'बी' प्लॅन आहे हे नाकारता येते का...??

मनसेचे नेते मोदी प्रेमात गरफटले होते. आता भाजपसोबत युती तोडण्याची घोषणा उध्दव साहेबांनी केल्यानंतर मनसे शिवसेनेची सहानुभूती कमी करण्यासाठी भाजपची सुपारी घेवून काम करत नाहीत हे कशावरून...???

असो, मनसे स्वत: एकतर्फी सांगत असताना यांत भाजपची सुपारी किती याचा विचार करायला हवा.

तरीही मराठी माणसांची काळजी करणारी मनसे... मराठी माणसासाठी शिवसेनेला बिनशर्थ पाठिंबा देण्याची तयारी करणार काय...?? जशी तयारी मनसे ने लोकसभा निवडणूकीत मोदींना पाठिंबा देण्यासाठी केली होती.

शिवसेनेच्या वाढत्या प्रभावाला खिळ घालून भाजपची सुपारी घेवून 'मनसे' भावनिक राजकारण करतेय.... हे पटतयं का?

अशी संपूर्ण पोस्ट शिवसेनेकडून व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झाली आहे.