मुंबई: सत्तेत भागीदार असूनही वारंवार भाजपला वेठीस धरणाऱ्या शिवसेनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘माझा व्हिजन’मध्ये कठोर शब्दात ठणकावलं आहे. राज्यातील भाजपचं सरकार वाचवण्यासाठी अनेक अदृश्य ‘हात’ काम करत असल्याचा गौप्यस्फोट यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्याचवेळी हा अदृश्य ‘हात’ म्हणजे ‘पंजा’ (काँग्रेसचा) नाही. अशी कोपरखळीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मारली.


‘आम्ही दोन वेगवेगळे पक्ष आहोत त्यामुळे थोड्या कुरबुरी होतच राहणार. पण त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. जर तशी परिस्थिती उद्भवलीच तर यासाठी अनेक अदृश्य हात हे आमचं सरकार वाचवण्यासाठी पुढे सरसावतील. त्यामुळे आमच्या सरकारला कोणताही धोका नाही. कोणताही भूकंप होणार नाही.’ असं स्पष्ट शब्दात मुख्यमंत्र्यानी शिवसेनेला सुनावलं.

दरम्यान, याचवेळी राष्ट्रपती निवडणुकीच्या मतांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘208 मतं पडली यानेच मला जास्त आनंद झाला. 145च्या मतांची आकडेवारी ही मला मीडियातून समजली.’ असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?

प्रश्न: ऑक्टोबर 2014पासून 144 या आकड्याला तुमच्या आयुष्यात महत्त्व प्राप्त झालं आहे का? आणि कालच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर 145 आकडा पाहिल्यावर तुमची काय भावना होती?

मुख्यमंत्री : खरं म्हणजे, हे गणित मला तुमच्याच माध्यमातून कळलं. मला हे इंटरप्रिटेशन माहितीच नव्हतं. मुळात 208 मतं मिळाली याच आनंदात मी होतो. तेव्हा त्याची फोड करुन पाहिली. अनेकांनी मला फोन देखील केले. अरे व्वा... 145 तुम्हाला शिवसेनेशिवाय.

हे बघा, एक गोष्ट नक्की सांगतो. आम्ही दोन पक्ष वेगळे लढलो. थोडा विरोध होतो. पण आम्ही पाच वर्ष गुण्यागोविंदानं सरकार चालवू. दुसरं असं आहे की, काही अडचण जरी आली. तर अनेक अदृश्य ‘हात’ हे सरकार वाचवण्यासाठी पुढे आहेत. आम्हाला काळजी करण्याची गरज नाही. ते अदृश्य ‘हात’ निश्चितपणे सरकार वाचवतील. आणि सरकार नीट चालेल. हात सगळे अदृश्य आहेत. आणि हातचा अर्थ ‘पंजा’ नाही.

प्रश्न :  हे सगळं लक्षात घेता. ही अधिकची मतं मिळाली ती कशी मिळाली? म्हणजे शिवसेनेच्या टेकूशिवाय तुमचं सरकार टिकणार?

मुख्यमंत्री : निगेटिव्ह विचार कशाला करायचा. आपण पॅझिटिव्हच विचार करु. एकत्रित छान, गुण्यागोविंदानं, कधी एकमेकांवर टीका करत, कधी एकमेकांवर कुरघोडी करत. शेतकऱ्यांच्या हिताकरता चांगलं काम करु.

आणि ही मतं कशी मिळाली. यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले नाहीत. मला वाटतं राष्ट्रपतीपदाची निवडणूक अशी असते. ज्यात कोणत्याही पक्षाचा व्हीप नसतो. साधारणपणे आमचे जे उमेदवार आहेत त्यांची कार्यपद्धती आहे. किंवा आमचे जे पंतप्रधान आहेत. त्यांची कार्यपद्धती ही अनेक लोकांना आवडते. ती पक्षातल्या आणि पक्षाबाहेरच्या लोकांनाही आवडते. त्यामुळे त्या कार्यपद्धतीवर मोहित होऊन. अशाप्रकारे आम्हाला मदत करतात. नेहमीच मदत करतात असं नाही. तर आम्हाला आवश्यकता असते त्यावेळी मदत करतात. तशीच ती राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत झाली आहे.

प्रश्न: पण सत्ता राखण्यासाठी शिवसेनेची गरज नाही असं वाटतंय का?

मुख्यमंत्री : तुम्ही का इतकं शिवसेनेला घालवायला निघाला आहात?  आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, अनेक अदृश्य ‘हात’ म्हणजे पंजा नाही. हे आमचं सरकार वाचवण्यासाठी पुढे सरसावतील. या सरकारला कुठलाही धोका नाही. कुठलाही भूकंप होणार नाही.