मुंबई : मनसुख हिरेन प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, आज एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यावेळी मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप हिरेन यांच्या कुटुंबियांनी केला होता. आज अखेर विमला हिरेन यांच्या फिर्यादिवरुन मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आज एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी पोहोचलं होतं. त्यावेळी हिरेन कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले. आज झालेल्या चौकशीमध्ये हिरेन यांच्या कुटुंबियांनी एटीएसला ही आत्महत्या असू शकत नाही, हा खून असल्याचे सांगितले. तसेच यावेळी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसुख हिरेन यांच्या मुलानं केली आहे. आतापर्यंत या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु, आता मनसुख हिरेन यांचा मुलगा एटीएसच्या पथकासोबत गेला असून आता याप्रकरणी कुटुंबियांच्या वतीनं हत्येचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, एटीएसच्या पथकानं मनसुख हिरेन यांच्या घरी तब्बल साडेतीन तास चौकशी केली. त्यानंतर त्यांच्या पत्नीच्या फिर्यादिवरून हत्येचा गु्न्हा दाखल करण्यात आला.


मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएसच्या तपासाला वेग


गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या प्रकरणाचा तपास एटीएसकडे सोपवला असल्याची माहिती दिली होती. अशातच एटीएसने याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. ज्या ठिकाणी मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला होता, त्याठिकाणी एटीएसच्या पथकानं भेट दिली आहे. एटीएसचे प्रमुख शिवदीप लांडे आपल्या टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले होते. तिथे त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. एटीएसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएसचं पथक संपूर्ण घटना समजून घेऊन क्राईम सीनही रिक्रिएट करणार आहे. तसेच एटीएसचं पथक संपूर्ण परिसरातील फोटेजही तपासत असून घरातून निघाल्यानंतर मनसुख हिरेन नेमके कुठे गेले, याचा शोध घेण्याचा एटीएसचं पथक प्रयत्न करत आहे. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी एटीएसच्या तपासाला वेग आला असून एटीएसच्या तपासातून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :