मुंबई : शिवसेनेला दगाफटक्याची चिंता नाही. मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसणार, असा विश्वास शिवसेना आमदार अनिल परब यांनी व्यक्त केला. एबीपी माझाच्या 'माझा कट्टा'वर अनिल परब बोलत होते.


महापौर निवडीत जो आमच्यासाठी हात वर करेल, तो आमचा मित्र असेल. भाजपने पाठिंबा दिला तरी आमचा महापौर असेल आणि पाठिंबा दिला नाही तरीही महापौर आमचाच असेल, असं अनिल परब म्हणाले.

जिद्दीच्या जोरावर शिवसेनेचं यश
युती तुटल्यामुळे शिवसैनिक एकजूट झाले. त्यांना आपलं सामर्थ्य समजलं. पैसे नव्हते, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशिवाय दुसरा स्टार प्रचारक नव्हता. फक्त जिद्दीच्या जोरावर शिवसेनेने मिळवलेलं यश समाधानकार असल्याचं परब यांनी सांगितलं. मात्र भाजपने सत्तेच्या जोरावर यश मिळवल्याचा पुनरुच्चार परब यांनी केला.

चव्हाण बोलले म्हणून पाठिंबा काढणार नाही
शिवसेनेने राज्याच्या सत्तेतून पाठिंबा काढल्यास काँग्रेस समर्थनाचा विचार करेल, असं विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलं होतं. "परंतु अशोक चव्हाण बोलले म्हणून आम्ही सत्तेतून पाठिंबा काढणार नाही. काँग्रेसकडून कोणीही पाठिंबा मागितला नाही. शिवाय त्यांच्यासोबत कोणतीही चर्चा झालेली नाही," असं अनिल परब यांनी स्पष्ट केलं.

मुंबई महापालिकेत शिवसेनेला 84 जागा तर भाजपला 82 जागा मिळाल्यानंतर सत्ता कोण स्थापन करणार याची चर्चा रंगली आहे.

भाजपकडून नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न
निवडून आलेले सर्व उमेदवार हे स्ट्राँग शिवसैनिक आहेत. महापौरपदासाठी भाजपकडून इतर पक्षांच्या नगरसेवकांना फोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण शिवसेनेला दगाफटक्याची चिंता नाही. मुंबईत शिवसेनेचाच महापौर होणार, असं विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.

फडणवींसांना अटक होऊन नये म्हणून मुंडेंचे प्रयत्न
मुंबई महापालिकेत घोटाळा झालेला नाही याचा उल्लेख एसआयटीच्या अहवालात आहे. घोटाळ्यांच्या चौकशीत क्लीन चिट देण्याचं आल्याचंही अनिल परब यांनी नमूद केलं. "याउलट नागपूर महापालिकेतील घोटाळ्याप्रकरणी नंदलाल समितीच्या चौकशी अहवालात तत्कालीन महापौर आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव होतं. देवेंद्र फडणवीस यांना अटक होऊ नये म्हणून गोपीनाथ मुंडेंनी गृहमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे प्रयत्न केल्याची ऐकीव माहिती होती" असा गौप्यस्फोटही अनिल परब यांनी कट्ट्यावर केला.

पोलिसांच्या मदतीने शिवसेना उमेदवारांना धमक्या
मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने सत्तेचा गैरवापर केला. पोलिसांच्या मदतीने शिवसेनेच्या उमेदवारांना धमक्या देण्यात आल्या. परंतु पैसे वाटणाऱ्या भाजप उमेदवाराला मात्र सोडलं, असा सनसनाटी आरोप अनिल परब यांनी केला. शिवाय मुंबईतील भाजपच्या यशाचं श्रेय सत्तेला आहे. भाजपची ताकद वाढलीय, पण शिवसेनेपेक्षा नाही, असंही ते म्हणाले.