मुंबई : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 17 मे रोजी मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबई आणि ठाण्याला हवामान विभागाकडून 17 मे रोजी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  16 आणि 17 मे रोजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.  


13 मे च्या सकाळीच दक्षिण पूर्व अरबी समुद्रात आणि लक्षद्वीपच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. 15 मे रोजी लक्षद्वीप आणि परिसरात वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तीव्रता वाढत 16 मे रोजी चक्रीवादळामध्ये रुपांतरीत होणार आहे. 


मुंबईत 16 मे रोजी हे चक्रीवादळ सक्रिय होणार असल्याचा हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईला या चक्रीवादळाचा धोका नसला तरीही मुंबई महानगरपालिका कोणताही धोका उद्भवू नये या दृष्टिकोनातून दक्षता घेत आहे. 


Cyclone : चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनही सज्ज


भारतीय हवामान विभागाने दिलेल्या सूचनेनुसार लक्षद्वीप बेट, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, दक्षिण कोकण, गोवा आणि गुजरात राज्यात 15 ते 18 मे याकाळात वादळाचा प्रभाव जाणवणार आहे. या काळात दक्षिण कोकणामध्ये वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 60 किलोमीटर इतका राहण्याची शक्यता आहे. या कालावधीमध्ये सिंधुदु्र्गात विजांच्या कडकडाट, वेगवान वारे यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्याच्या वेगामध्ये ताशी 60 कि.मी. पर्यंत वाढ होण्याची ही शक्यता आहे. 15 मे रोजी वाऱ्याचा वेग 70 कि.मी. पर्यंत वाढू शकतो असेही या इशाऱ्यामध्ये सांगितले आहे.