मुंबई: भाजप नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरुन, विधानसभेत फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं.


अंतिम आठवडा प्रस्तावाचा अधिकार विरोधकांचा असल्याचं सांगतं एकनाथ खडसे यांनी नियमावर बोट ठेवून सरकारची कोंडी केली.

तर सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

एकनाथ खडसे काय म्हणाले?

विधानसभेतल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरून माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला. अंतिम आठवडा प्रस्ताव ठरवण्याचा अधिकार हा विरोधकांचा आहे. जर विषय जास्त असतील तर अध्यक्ष विरोधकांना विषय कमी करण्याची विनंती करतील, मात्र अंतिम आठवडा प्रस्तावातील बदल हे सत्ताधारी आणि विरोधकांनी संगनमतानं करायचे असतात, असं खडसे म्हणाले.

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

खडसेंनी दिलेल्या सरकारच्या आहेराचं विरोधकांनी स्वागतच केलं. सरकारनं आमचा आवाजच बंद केला आहे. कोणते मुद्दे चर्चेला घ्यावे हे आम्ही ठरवणार, तसंच सरकार मंत्र्यांचा भ्रष्टाचार लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं.

"सर्व भ्रष्ट मंत्री तसेच प्रकाश मेहता यांची चौकशी व्हावी. विश्वास पाटील यांची चौकशी कधी होणार? ही चौकशी निवृत्त न्यायाधिशांच्या नेतृत्वाखाली व्हावी. राधेश्याम मोपलवार आणि मेहता यांची चौकशी निष्पक्ष व्हावी", अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

मोपलवर आणि मेहता प्रकरणी त्यांनाच विचारून चौकशी लावली जात आहे, अशी माहिती मला समजली आहे. मुख्यमंत्री क्लीन चिट देतात, याला आमचा विरोध आहे. हे विषय अंतिम आठवडा प्रास्तावातून वगळले आहेत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाणांनी केला.

जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया

अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांचा अधिकार असतो, या प्रस्तावावर चर्चा करायची नाही म्हणून आमचे प्रस्ताव रद्द केले. आमचे अधिकार मारले गेले, ही लोकशाहीची हत्या आहे, अशी प्रतिक्रिया  जितेंद्र आव्हाड यांनी दिली.