मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आमदार फुटीची चर्चा रंगली आहे. मात्र चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले तर कोण माय का लाल निवडून येणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी मी भाजपला मदत करेन असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं होतं. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. बी वाय सेंटरमध्ये राष्ट्रवादीच्या बैठकीआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.


भाजपच्या सत्तेसाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. लवकरच 145 आमदारांची जुळवाजुळव करुन सत्तास्थापनेसाठी भाजपला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे, असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.

तीन पक्ष एकत्र आले तर माय का लाल निवडून येणार नाही
अजित पवार म्हणाले की, "निवडणूक झाली झाली त्या दिवसाची परिस्थिती आणि आज 13 नोव्हेंबरची परिस्थिती यात जमीन आस्मानचा फरक आहे. सगळे आमदार आपापल्या पक्षासोबतच राहतील. सगळे आपापल्या पक्षासोबतच राहतील. एखाद्या आमदाराने दबावाखाली राजकीय भूमिका घेतली आणि तिथे निवडणूक लागेल. जर ए, बी, सी हे ती पक्ष असतील. 'ए'चा आमदार फुटला, तर 'ए' पक्ष जो उमेदवार देईल, त्याला 'बी' आणि 'सी' पाठिंबा देतील. चार पक्षातील तीन पक्ष एकत्र आले तर कोण माय का लाल निवडून येणार नाही."

संबंधित बातम्या

राज्यात राष्ट्रपती राजवट
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसं संख्याबळ नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने वेळ वाढवून मागितली. परंतु राज्यपालांनी वेळ वाढवण्यास नकार दिला आणि राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. त्यानुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी केली आणि महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली.

राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आता राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या 54 आमदारांसोबत बैठक सुरु झाली आहे. मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक सुरु आहे. त्यासाठी अजित पवार, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीचे अन्य प्रमुख नेते उपस्थित आहेत. तरी, या बैठकीत सत्तास्थापनेच्या दिशेने पुढे काय पावलं उचलली जातील, हे पाहणं महत्त्वाचं आहे.