मुंबई: शिवकालीन इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या अफजलखानाच्या वधाच्या (afzal khan vadh) प्रसंगाची आणि छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) शौर्याची महती सांगण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच प्रतापगडाच्या (Pratapgad Fort) पायथ्याशी एक पुतळा उभारला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखांनी धिप्पाड अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला होता. त्याच प्रसंगाची आठवण करुन देणारा पुतळा प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारला जाणार आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हा पुतळा बसवण्याची घोषणा केली होती.


येत्या महिनाभरात या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. या पुतळ्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून तयार करण्यात आलेला हा पुतळा 18 फुटांचा आहे. हा पुतळा सध्या पुण्यात आहे. शिल्पकार दीपक थोपटे यांनी हा पुतळा तयार केला आहे. 


किल्ले प्रतापगडावर दरवर्षी शिवप्रताप दिन साजरा केला जातो. या दिनानिमित्त सरकारच्या वतीने प्रतापगडावर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला कंठस्नान घातलं, तो दिवस शिवप्रतापदिन म्हणून साजरा केला जातो. शिवरायांच्या शौर्याच्या अनेक प्रसंगापैकी एक म्हणजे अफझलखानाचा वध आहे. त्यानिमित्तच प्रतापगड उत्सव म्हणजेच शिवप्रताप दिन साजरा केला जातो. 


10 नोव्हेंबर 1659 रोजी झालेली प्रतापगडाची लढाई ही आजही शिवप्रेमींच्या कौतुकाचा विषय आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चाल करुन आलेल्या अफजलखानाला मोठ्या हुशारीने चर्चेचा प्रस्ताव देऊन प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावले. प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या शामियान्यात शिवाजी महाराज आले तेव्हा अफजलखानाने त्यांच्याशी दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सावध असलेल्या शिवरायांनी आपल्या हातातील वाघनखांनी अफजलखानाच्या पोटातील कोथळा बाहेर काढला होता आणि स्वराज्यावरील आदिलशाही आक्रमण परतवून लावले होते. प्रतापगडाच्या लढाईचा हा किस्सा आजही शिवप्रेमींकडून आवर्जून नव्या पिढीला सांगितला जातो.


अफजलखानाच्या कबरीचा वाद


अफलजलखानाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. या कबरीवरुन आतापर्यंत अनेकदा वाद झाला आहे. हिंदुत्त्वादी संघटनांकडून अनेकदा अफजलखानाची कबर उकरण्याचा इशारा देण्यात आला आहे. या गडाच्या पायथ्याला असलेल्या  अफजल खानाच्या कबरीमुळे प्रतापगडाकडे आणि या उत्सवाकडे सर्वांचं लक्ष असते. हिंदुत्ववादी संघटनांनी उपस्थित केलेल्या वादानंतर शिवप्रताप दिन उत्सव आता सरकारच्या वतीने साजरा केला जातो.


आणखी वाचा


मोदींना सत्ता आणायला छत्रपती लागतात, पण अरबी समुद्रात भूमिपूजन करून शिवरायांचे स्मारक होत नाही; मनोज जरांगे यांची जोरदार टीका