मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचं असेल तर 100 टक्के लसीकरणाची गरज असल्याचं मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. राज ठाकरे यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्री मोदी यांना पत्र लिहून केंद्राची मदत मागितली आहे. राज्यातील सर्व वयोगटातील 100 टक्के लोकांचं लसीकरण लवकरात लवकर करायला हवं. रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा असावा म्हणून राज्याला आवश्यक पावलं उचलण्यासाठी मोकळीक द्यावी," असं राज ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.


स्थानिक परिस्थितीला अनुसरुन उपाययोजना आखण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन द्या
"महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती सर्वात बिकट आहे. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणं, लॉकडाऊन जाहीर करणं महाराष्ट्राला परवडणारं नाही. त्यामुळे या संसर्गाला तोंड द्यायचं असेल तर 100 टक्के लसीकरणाची गरज आहे. यासाठी कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी राज्याला केंद्राची साथ हवी आहे," असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसंच "आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही तर स्थानिक परिस्थितीला अनुसरुन योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहनच द्यावं," अशी विनंतीही केली.


राज ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केलेल्या प्रमुख मागण्या
"राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करु द्याव्या. हाफकिन आणि हिंदुस्तान अँटिबायोटिकला लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.






राज ठाकरे यांचं पत्र


"गेल्या वर्षी कोविड-19 ची साथ सुरु झाल्यापासून महाराष्ट्र राज्याला या साथीचा सर्वाधिक फटका बसला आहे. देशातल्या पहिल्या काही रुग्णांपैकी काही महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासूनच महाराष्ट्रात निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यू देखील झाले आहेत. आज सारा देश कोविड-19च्या साथीला तोंड देत असताना महाराष्ट्रातील स्थिती सर्वात बिकट आहे.


कोविड-19 ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभर पडलेले आपण अजूनही अनुभवत आहोत. ही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो?


या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या संसर्गाला तोंड द्यायचे असेल तर 100 टक्के लसीकरण करण्याची रणनीती महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आणि कळीची आहे.


महाराष्ट्राला 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवून राज्यातील सर्व वयोगटातील 100 टक्के लोकांचं लसीकरण लवकरात लवकर करायला हवं.


हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेषत: कमी कालमर्यादेत आवश्यक तेवढ्या लसी पुरवण्यासाठी महाराष्ट्राला केंद्राची साथ तर हवीच 


म्हणून माझी केंद्राकडे मागणी आहे की


- राज्याला स्वतंत्रपणे लसी खरेदी करु द्याव्या


- राज्यातल्या खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात


- 'सीरम'ला महाराष्ट्रात मुक्तपणे पण योग्य नियमन करुन लस विक्रीची परवानगी द्यावी


- लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून महाराष्ट्रातल्या इतर संस्थांना (हाफकिन आणि हिंदुस्तान अँटिबायोटिक लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी


- कोविड-19 रोगाचा उपचार करण्यासाठी लागणारी आवश्यक औषधे, उदा. रेमडेसिवीर, ऑक्सिजन याचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी


कोविड-19 च्या साथीमुळे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहे. साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. आरोग्य हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही तर स्थानिक परिस्थितीला अनुसरुन योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहनच द्यावे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, ज्यातून एकमेकांना शिकण्याती संधीही मिळेल.


या सर्व सूचनांकडे तुम्ही सकारात्मक दृष्टीने पाहाल आणि प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा नव्हे खात्रीच आहे.


जय हिंद, जय महाराष्ट्र


आपला नम्र
राज ठाकरे