Maharashtra Cabinet : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. परंतु मिळालेल्या माहितीनुसार दोन टप्प्यांमध्ये हा विस्तार होणार आहे. या विस्तारात भाजपला 27 ते 28 मंत्री पद मिळतील तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला तेरा ते चौदा मंत्री पद मिळणार आहेत, अशी माहिती आहे. 


एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाल्यानंतर आता महाराष्ट्राला नवे कारभारी कधी मिळतात याची उत्सुकता लागली आहे. त्यानुसार नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीपूर्वी पहिल्या टप्प्याचा शपथविधी होईल तर दुसरा टप्पा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर होणार आहे.


पहिल्या टप्प्यात शिंदे आणि भाजपच्या कोट्यातील काही प्रमुख चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. येत्या 18 जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे त्याआधी हा शपथविधी सोहळा होणार आहे. यात दोन्ही बाजूच्या 10 ते 12 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. भाजपकडे 27 ते 28 मंत्रिपदे असणार आहेत.


गृह खात्यासह महत्वाची खाती भाजपकडे


गृह विभाग, अर्थ विभाग, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माण, जलसंपदा, ऊर्जा, उच्च आणि तंत्रशिक्षण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, पर्यटन, अन्न व नागरी पुरवठा, कौशल्य विकास, ओबीसी विकास, ग्रामविकास ही खाती भाजपकडे असतील. 


महसूल आणि आरोग्य विभाग कोणाकडे असेल याबद्दल अद्यापही चर्चा सुरू आहे.


शिंदे गटाकडे 13 ते 14 मंत्रिपद


एकनाथ शिंदे गटाकडे 13 ते 14 मंत्रिपद असतील.  यात नगरविकास, उद्योग, कृषी, खाणकाम, वाहतूक, पर्यावरण, रोजगार हमी, फलोत्पादन, शालेय शिक्षण, मृद व जलसंधारण आदी खाती मिळण्याची शक्यता आहे.


शिंदे फडणवीस सरकारचा शपथविधी दोन टप्प्यात होणार असला तरीही या दोन्ही टप्प्यात सर्वच्या सर्व 42 मंत्रिपद भरली जाणार नाहीत. दोन्ही बाजूने मिळून किमान तीन ते चार मंत्रिपद रिक्त ठेवली जाणार आहेत. आमदारांमध्ये नाराजी होऊ नये यासाठीच हा फॉर्मुला राबवला जातोय.