मुंबई : निकाल रखडवणाऱ्या मुंबई विद्यापीठाविरोधात एलएलबीच्या तीन विद्यार्थ्यांनी हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. रोजगाराच्या संधी हिरावल्यामुळे दहा लाखांची नुकसान भरपाई देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.


सचिन पवार, अभिषेक भट आणि रवीशेखर पांडे या कायद्याच्या तीन विद्यार्थ्यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेऊ शकलो नाही, त्यामुळे आपल्या करिअरवर परिणाम पडल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांनी आपले निकाल मागितल्यामुळे रोजगाराच्या संधी हुकल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. नुकसान भरपाई म्हणून मुंबई विदयापीठानं आपल्याला 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी याचिकेत केली आहे.

एलएलबी शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा 30 मे रोजी संपली होती. नियमानुसार 45 दिवसांच्या आत निकाल लावणं अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठाने फारच दिरंगाई केल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'निकाल रखडण्याची ही पहिलीच वेळ नाही. जून ते डिसेंबर 2016 दरम्यान 388 पैकी 210 निकाल उशिरा लागले', असा दावाही तिघांनी केली आहे.