मुंबई : राज्यात सत्ता नको तर विरोधी पक्षाची धुरा आमच्या हाती द्या, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी मतदारांना केलं आहे. कालची पुण्याची सभा पावसामुळे रद्द झाल्यानंतर मुंबईत राज ठाकरेंच्या दोन प्रचार सभा आज पार पडल्या.


महाराष्ट्राला प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्ष तुमच्या मनातली खदखद व्यक्त करु शकतो. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारू शकतो. आज मी तुमच्याकडे प्रबळ विरोधी पक्षाची मागणी मागत आहे. मला माझ्या पक्षाचा आवाका माहित आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं.


झाडं कापल्यानंतर आरेला जंगल घोषित करणार का?


आरे वृक्षतोडीवरुनही राज ठाकरेंनी भाजप आणि शिवसेनेवर तोफ डागली. आरेतील शेकडो झाडे कापली आणि न्यायालये देखील सरकारला साजेसं निर्णय देत आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री शिवसेनेचे आहेत मग ते आरेतील झाडांची कत्तल का थांबवू शकले नाही? सत्तेत आल्यानंतर आरेला जंगल घोषित करु या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचाही राज ठाकरेंनी समाचार घेतला. आरेतील झाडं कापल्यानंतर त्याला जंगल घोषित करणार का? आम्हाला मूर्ख समजता का? अशी टीका राज ठाकरेंनी केली.


शहरांची बकाल अवस्था आणि रस्त्यावरील खड्डे यावरुनही राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. शहरांच्या नियोजनात अभाव आहे. निवडणुका आल्या की राजकीय पक्षांचे जाहीरनामे बाहेर येतात. मनात येईल ती आश्वासने दिली जातात. मात्र परिस्थिती जैसे थे अशीच असते. विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात मग तुमचे प्रश्न मांडणार कोण? बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यातील अनेक उद्योगधंदे बंद पडत आहेत. अशी परिस्थितीत आपण सत्ताधाऱ्यांना कधी प्रश्न विचारणार आहोत? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.




राज ठाकरेंच्या गोरेगावमधील सभेतील मुद्दे




  • भाजप-शिवसेने सरकारकडून रोज नवनवीन थापा ऐकायला मिळतात - राज ठाकरे

  • ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटवरुन निवडणुकीवर बहिष्कार टाकायला विरोधी पक्षांचा नकार - राज ठाकरे

  • ईडीची चौकशी लावली तरी माझं थोबाड बंद होणार नाही- राज ठाकरे

  • निवडणुकीच्या राजकारणासाठी चौकशा मागे लावल्या आहेत- राज ठाकरे

  • जे घाबरले ते भाजपमध्ये गेले, मी या सगळ्या चौकशांना घाबरत नाही- राज ठाकरे

  • आरेवरुन शिवसेना सर्वांना मुर्ख बनवतेय - राज ठाकरे

  • पर्यावरण मंत्री शिवसेनेचे असताना आरेतील झाडे कापली कशी? - राज ठाकरे

  • आरेतील झाडं कापल्यानंतर त्याला जंगल घोषित करणार का? राज ठाकरेंचा सवाल

  • भ्रष्टाचाराचे आरोप असणारे भाजपमध्ये गेले, कुठे राहिलं 'पार्टी विथ डिफरन्स'- राज ठाकरे

  • बाळासाहेब असताना शिवसेनेत बाहेरचे नेते आयात करावे लागत नव्हते- राज ठाकरे

  • कलम 370 रद्द केलं त्याबद्दल अभिनंदन, मात्र इतर मुद्द्यांवर कोण बोलणार? - राज ठाकरे

  • कलम 370 चा महाराष्ट्रातील राजकारणाची काय संबंध - राज ठाकरे

  • शिवसेनेच्या मंत्र्यांनी राजीनाम्याची केवळ धमकी दिली

  • आमची युतीत इतकी वर्ष सडली आणि 124 वर अडली, उद्धव ठाकरेंना टोला

  • जपानकडून 1 लाख 10 हजार कोटींचा बुलेट ट्रेन प्रकल्प कोणासाठी आहे, यासाठी आदिवासींच्या जमिनी का घेतल्या जात आहेत - राज ठाकरे


राज ठाकरेंच्या सांताक्रुज येथील सभेतील मुद्दे

  • राज्यातील खड्ड्यांवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

  • शहरांचं नियोजन कोसळलंय, एक-दीड तासाच्या पावसाने पुणे भरतं कसं? राज ठाकरेंचा सवाल

  • निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात, पुन्हा परिस्थिती जैसे थे - राज ठाकरे

  • विरोधी पक्षाचे नेते सत्ताधारी पक्षात जातात आणि सत्ताधारीही काही बोलत नाहीत, मग तुमचे प्रश्न मांडणार कोण?- राज ठाकरे

  • तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं त्याचं काय झालं? - राज ठाकरे

  • उद्योग बंद पडत असल्याने अनेकजण बेरोजगार झाले - राज ठाकरे

  • राज्याला सक्षम, प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे- राज ठाकरे

  • मी विरोधी प्रबळ विरोधी पक्षाची मागणी करत आहे - राज ठाकरे

  • माझ्या हाती विरोधी पक्षाची सत्ता द्या, राज ठाकरेंचं नागरिकांना आवाहन