मुंबई : "कुणाच्या पायर्‍या चाटत राजकारणात जिवंत राहण्याची धडपड करायला मी काही अनिल परब नाही," अशी जळजळीत टीका भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. महागाईविरोधात शिवसेनेने काढलेल्या मोर्चावरुन आशिष शेलार आणि अनिल परब यांनी एकमेकांची लायकी काढली.


महागाईविरोधात शिवसेनेने आज मुंबईभर ठिकठिकाणी मोर्चे काढले. "नरेंद्र सरकार हाय हाय, देवेंद्र सरकार हाय हाय", अशा घोषणा देत शिवसैनिकांनी सरकारचा निषेध केला. मात्र कहर म्हणजे सत्तेत असलेल्या शिवसेनेने 'एवढी माणसं कशाला, मोदींच्या मयताला,'अशा घोषणा देत टोक गाठलं.

यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. यानंतर आशिष शेलार आणि शिवसेना नेते अनिल परब यांच्या शाब्दिक चकमक झाली. लोकप्रतिनिधींनी अशा भाषेचा उपयोग करणं योग्य आहे का, अशी विचारणा केली असता, परब आणि शेलार यांनी एकमेकांवर शब्दांचे प्रहार केले.

आशिष शेलार यांनी ट्विटरच्या माध्यमातून अनिल परब यांच्यावर टीका केली. "जे मोदीजींच्या नावाने निवडून आले. सत्तेच्या खुर्चीवर बसले तेच आज मोदींच्या विरोधी घोषणा देतात. खाल्ल्या ताटात घाण करणारे अशांनाच म्हणतात!" असं ट्वीट शेलार यांनी केलं.

https://twitter.com/ShelarAshish/status/911499927100018688

https://twitter.com/ShelarAshish/status/911500089746771968

"ज्यांची एकही निवडणूक लोकांमधून लढवण्याची औकात नाही. अशांनी माझ्यासारख्या सातत्याने लोकांमधून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीवर बोलू नये. कुणाच्या पायर्‍या चाटत राजकारणात जिवंत राहण्याची धडपड करायला मी काही अनिल परब नाही!" असे ट्वीटही आशिष शेलार यांनी केले आहेत.

https://twitter.com/ShelarAshish/status/911527544951906304

https://twitter.com/ShelarAshish/status/911527607870590976

यावर प्रत्युत्तर देताना अनिल परब म्हणाले की, "मातोश्री माझ्यासाठी मंदिर आहे, त्याच्या पायऱ्या धुवायची आणि चाटायची माझी तयारी आहे. महापालिकेत एका मताने का होईना आम्ही जिंकलो आहे. आम्ही आजपर्यंत कधीही खाल्ल्या ताटात घाण केली नाही."

"आशिष शेलार हे मातोश्रीच्या पायऱ्या चाटत चाटत आले आहेत. त्यांनी 2014 च्या आधीचा काळ आठवावा, साहेबांच्या भेटीसाठी ते तासनतास मातोश्रीबाहेर वाट बघत बसायचे हे विसरु नये, त्यामुळे कोण कोणाच्या जीवावर मोठं झालंय हे लोकांना माहित आहे," असं अनिल परब म्हणाले.

तर "सुरुवात अनिल परबांनी केली होती. मी कमळाच्या चिन्हावर निवडून आलोय. पाठिंबा काढल्यावर कुणाला कुणाची औकात कळेल. मी कुणाच्या मेहेरबानीवर जिंकलो नाही. तुमचे मंत्री आमच्या पाठिंब्यावर बनले आहे. अनिल परबांना त्यांच्या स्वभावासाठी शुभेच्छा," असं उत्तर आशिष शेलार यांनी दिलं.