मुंबई : तुमचं काम होत नाही म्हणून तुम्ही सरकारला आत्मदहनाचा इशारा दिला असेल, तर तुमचं नाव मंत्रालयाबाहेर लिस्टवर लागण्याची शक्यता आहे. मुंबईतील मंत्रालय परिसरात सध्या 37 जणांची यादी लावण्यात आली आहे.


यादीमध्ये महिलांचाही समावेश आहे. इतकंच नाही तर काही जणांचे फोटोही मंत्रालय परिसरात लावले आहेत. या लोकांनी सरकारला आत्मदहनाचा इशारा दिला आहे, त्यामुळे पोलीस यंत्रणा त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवून आहे.

मार्च 2016 मध्ये नांदेडच्या माधव कदम या शेतकऱ्यांना मंत्रालय परिसरात विष पिऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर फडणवीस सरकारवर जोरदार टीका झाली. आता मंत्रालय परिसरात पुन्हा अशी घटना होऊ नये आणि सरकार टीकेचं धनी होऊ नये, यासाठी सरकारनं हे पाऊल उचललं आहे.

आपलं सरकारच्या माध्यमातून राईट टू सर्विसचा अधिकार दिला, पण तो कागदावर आहे. लोकांची कामं व्हायला अजूनही तितकाच वेळ लागतो. त्यामुळे वैतागून लोक आंदोलनाचं हत्यार उपसतात. मात्र त्यांना अशी गुन्हेगारासारखी वागणूक देणं, त्यांचे फोटो जाहीरपणे गेटवर लावणं कितपत योग्य आहे? याचं उत्तर एकदा फडणवीसांनीच द्यावं.