Knight Frank Wealth Report 2022: देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे सर्वात श्रीमंत शहर आहे. अशातच नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या नाइट फ्रँकच्या ‘दि वेल्थ’ अहवालानुसार, देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती हे मुंबईत राहत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.  भारतात 2021 मध्ये श्रीमंत व्यक्तींची संख्या ही 11 टक्क्यांनी वाढली असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. तर जागतिक स्‍तरावर 2021 मध्ये अत्‍यंत श्रीमंत व्यक्तींच्या संख्येत 9.3 टक्क्यांनी वाढली झाली असून ही संख्या आता 6,10,569 वर पोहोचली आहे. यासोबतच अमेरिका-चीननंतर सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती हे भारतात असल्याचेही या अहवालात सांगण्यात आले आहे. 


2016 च्या तुलनेत मुंबईत श्रीमंतांची संख्या वाढली 


मुंबईत 2016 च्या तुलनेत 2021 मध्ये श्रीमंतांच्या संख्येत 42.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत 2016 मध्ये 1,119 सर्वाधिक श्रीमंत राहत होते. आता ही संख्या वाढून 2021 मध्ये 1,596 वर पोहोचली आहे. 2026 पर्यंत मुंबईत श्रीमंतांच्या संख्येत 29.6 टक्क्यांनी वाढ होऊन ही संख्या 2069 पर्यंत पोहोचेल, असा अंदाज देखील या अहवालात वर्तवण्यात आला आहे.  


यामुळे वाढली देशात श्रीमंताची संख्या 


अत्यंत श्रीमंत लोकांच्या संख्येत ही वाढ शेअर बाजारातील तेजी आणि डिजिटल क्रांतीमुळे झाली आहे. 2021 मध्ये जागतिक स्तरावर अब्जाधीशांच्या लोकसंख्येमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. 748 अब्जाधीशांसह अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे, तर 554 अब्जाधीशांसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच 145 अब्जाधीशांसह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.


देशात श्रीमंत व्यक्तींची संख्या 11 टक्क्यांनी वाढली  


नाइट फ्रँकच्या ‘दि वेल्थ’ अहवालानुसार,  "भारतातील अत्यंत श्रीमंत लोकांची संख्या (तीन कोटी किंवा त्यापेक्षा अधिक डॉलर्स संपत्ती असलेले व्यक्ती) 2021 मध्ये वार्षिक 11 टक्क्यांनी वाढली आहे." अहवालानुसार, भारतात अधिक संपत्ती असलेल्या श्रीमंतांची संख्या 2021 मध्ये 13,637 होती, जी मागील वर्षी 12,287 होती.


हे ही वाचा-