मुंबई : माफियांशी समझौत्याची चर्चा होऊ शकत नाही. महापालिकेत माफियाबंदी स्वीकारावी लागणार आहे, असा घणाघात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. महापालिका निवडणुकांच्या तोंडावर युतीबाबत कोणताही ठोस निर्णय झाला नसताना शिवसेना-भाजपमध्ये तू-तू-मै-मै सुरुच आहे.


'माफियांशी समझौत्याची चर्चा होऊ शकत नाही. महापालिकेत माफियाबंदी स्वीकारावी लागणार आहे. राहता राहिला प्रश्न जाहीरनाम्याचा, तर शिवसेनेने आतापर्यंत काय केलं? महापालिकेतील गेल्या 22 वर्षांचा हिशोब द्यावा', अशी मागणी सोमय्यांनी केली. शिवसेना आणि सेना नेत्यांची नोटाबंदीमुळे नाकाबंदी झाली आहे, त्यामुळे त्यांची अडचण समजू शकतो, अशी टीकाही किरीट सोमय्या यांनी केली.

भाजप हा मुंबईच नव्हे, तर महाराष्ट्र, देशात एक नंबरचा पक्ष आहे. कोणी मित्रपक्ष आमच्याबरोबर येत असेल तर त्यांना किती जागा द्यायच्या हा एक मुद्दा आहे. मात्र आम्ही कुणाकडे भीक मागत नाही तो काळ आता गेला, असा टोलाही किरीट सोमय्यांनी लगावली.

मालमत्ता करमुक्तीची घोषणा आमची : आशिष शेलार


शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 500 चौरस फुटांपर्यंतची घरं मालमत्ता करमुक्त करण्याची घोषणा केली खरी, मात्र ही मागणी आपली असल्याचा दावा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे.

मी आमदार म्हणून राज्य सरकारकडे ही मागणी केली होती. तसेच तिला राज्य सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

आता भाजपच्या जाहीरनाम्यात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होईपर्यंत रस्ते टॅक्स घ्यायचा नाही अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असं शेलार यांनी सांगितलं.

रस्ते टॅक्समधून महापालिकेला 500 ते 600 कोटी मिळतात, पण रस्त्यांची अवस्था तशीच असते. त्यामुळे महापालिकेच्या ‘टॅक्स टेररिझम’मधून मुंबईकरांना सुटका मिळावी, ही आमची भूमिका आहे. यानंतर आता काही जणांना उपरती होत आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

सध्या महापालिका रस्ते टॅक्स आकारते. एकूण करापैकी साधारण 13 टक्के कर हा रस्ते टॅक्स मधून येतो. त्यामुळे जोपर्यंत रस्ते खड्डेमुक्त होत नाही, तोपर्यंत रस्ते टॅक्स आकारणार नाही, असा भाजपचा मानस आहे.

तसेच जोपर्यंत मुंबईकरांना चोवीस तास पाणी मिळत नाही तोपर्यंत पाणी पट्टी आकाराली जाणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे.